लखनौवर भाजपचा अडीच दशके ताबा | पुढारी

लखनौवर भाजपचा अडीच दशके ताबा

उमेश कुमार

उत्तर प्रदेशात ज्या पक्षाची सत्ता असते त्याच पक्षाचे केंद्रात सरकार स्थापन होत असल्याचा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमधून निवडून येणार्‍या खासदारालाही महत्त्व आहे. उत्तरप्रदेशात गेली दहा वर्षे भाजपची सत्ता असून लखनौ मतदारसंघावर तब्बल अडीच दशकांपासून भाजपचा ताबा आहे.

लखनौ मतदारसंघात 1991 ते 2019 पर्यंत भाजपने लागोपाठ विजय मिळविला आहे. या मतदारसंघाने अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा पंतप्रधान देशाला दिला आहे. वाजपेयी 1991 ते 2004 पर्यंत तब्बल पाच वेळा लखनौ येथून विजयी झाले होते. 2009 मध्ये लालजी टंडन यांचा विजय झाला होता. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आता तिसर्‍यांदा राजनाथसिंह या मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जात आहेत.
लखनौ मतदारसंघावर 1951 ते 1989 पर्यंत कांग्रेसचा ताबा होता. मात्र, 1991 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी काँग्रेसचा हा गड हिसकावून घेतला. तेव्हापासून आतापर्यंत लखनौ मतदारसंघावर भाजपचा ताबा आहे. उत्तरप्रदेशात सपा, बसपा या दोन्ही पक्षाला सत्ता मिळूनही लखनौमधून विजय मिळविता आला नाही. वाजपेयी यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी 54 टक्के मते घेऊन विक्रम केला आहे. राजनाथ सिंह यांना वाजपेयी यांच्यापेक्षाही जास्त मते मिळाली. 2019 मध्ये राजनाथ सिंह यांनी तब्बल 3 लाख 47 हजार 303 इतकी मते मिळवून विजय संपादन केला होता.

उत्तरप्रदेशात लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 80 पैकी 65 जागांवर विजय मिळविला होता. भाजपने जिंकलेल्या 303 जागांमध्ये उत्तरप्रदेशचे मोठे योगदान होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील वाराणशी मतदारसंघातून निवडून येतात.

Back to top button