पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशमधून वरुण गांधी यांना भाजप तिकिट देणार का, या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. त्यांची तिकिटाची प्रतीक्षा आजही कायम आहे. त्यामुळे आता भाजपने तिकीट न दिल्यास ते अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधींनी पिलीभीत मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांनी सलग तिसऱ्यांदा ही जागा जिंकली. उत्तर प्रदेशातील पिलीभीत जागेसाठी नामनिर्देशनपत्रांचे चार संच आणले होते. ते पुन्हा दिल्लीला गेले आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी,भाजपने आतापर्यंत बसपचे माजी खासदार रितेश पांडे यांना आंबेडकर नगरमधून उमेदवारी दिली आहे, तर हेमा मालिनी, रवी किशन, अजय मिश्रा टेनी, महेश शर्मा, एसपीएस बघेल आणि साक्षी महाराज हे त्यांच्या जागेवरून पुनरावृत्ती झालेल्यांपैकी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीमधून निवडणूक लढवणार आहेत.
कोअर कमिटीच्या बैठकीत वरुण गांधी यांना तिकीट देण्यास भाजपच्या सर्व राज्यस्तरीय नेत्यांनी विरोध केला आहे. आता भाजपने त्यांना तिकिट नाकारल्यास ते अपक्ष निवडणूक लढवू शकतात, असे मानले जात आहे. समाजवादी पार्टीनेही त्यांना उमेदवारी देवू असे जाहीर केले होते. मात्र आता भाजपने तिकिट नाकारल्यास वरुण गांधी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरतील, असे मानले जात आहे.