‘निवडणुकीदरम्यान हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही ‘: प. बंगालमध्‍ये मुख्य निवडणूक आयुक्तांची स्‍पष्‍टोक्‍ती | पुढारी

'निवडणुकीदरम्यान हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही ': प. बंगालमध्‍ये मुख्य निवडणूक आयुक्तांची स्‍पष्‍टोक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही, असे स्‍पष्‍ट करत निवडणुकीदरम्यान हिंसाचार रोखण्यासाठी निवडणूक आयोग सी व्हिजिल नावाचे ॲप्लिकेशन लॉन्च करणार आहे, अशी माहिती मुख्‍य निवडणूक आयुक्‍त राजीव कुमार यांनी आज (दि. ५ मार्च) पश्‍चिम बंगालमध्‍ये पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राजीव कुमार म्‍हणाले की, निवडणुकीदरम्यान हिंसाचार रोखण्यासाठी निवडणूक आयोग सी व्हिजिल नावाचे ॲप्लिकेशन लॉन्च करणार आहे. C-VIGIL याचा अर्थ नागरिकांची दक्षता. राज्यात पारदर्शी, निष्पक्ष आणि हिंसाचारमुक्त निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. निवडणुकीत भीती किंवा धाक दाखवायला जागा नाही. नोकरशहांची पक्षपाती वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. राज्यात पुरेशा प्रमाणात केंद्रीय दलही तैनात केले जाईल, असेही त्‍यांनी नमूद केले.

C-VIGIL ॲपचे वैशिष्ट्ये

राजीव कुमार यांनी C-VIGIL ॲपच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. ते म्हणाले की, निवडणुकीसाठी कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा हिंसाचाराची तयारी केली जात असेल, तर वापरकर्ते या ॲपद्वारे तक्रारी करताच 100 मिनिटांत दोषींवर कारवाई केली जाईल. कोणत्याही उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर या ॲपद्वारे उमेदवाराची ओळख पटवून त्याच्यावरील गुन्हेगारी प्रकरणे ओळखता येतील. यासोबतच उमेदवाराला त्याच्यावरील फौजदारी आरोपांबाबत तीन वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध कराव्या लागतील. राजकीय पक्षांनाही त्यांच्या वेबसाईट आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे काम करावे लागणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

काही निवडणूक केंद्रांची जबाबदारी दिव्‍यांग आणि महिलांवर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही मतदान केंद्रावर फक्त महिलाची नियुक्‍ती केली जाईल. त्या निवडणूक केंद्रांवर सुरक्षा दलाच्‍या कर्मचारीही महिलाच असतील. त्याचप्रमाणे काही मतदान केंद्र पूर्णपणे दिव्यांग व्यक्तींद्वारे चालवले जातील. या व्‍यक्‍ती कोणापेक्षा कमी नाहीत, असा समाजात एक आदर्श निर्माण होईल, असा विश्‍वासही राजीव कुमार यांनी व्‍यक्‍त केला.

पश्‍चिम बंगालमध्‍ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या पथकाने सोमवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. या बैठकीत भाजपने लोकसभा निवडणुकीच्या काळात राज्यात फक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) तैनात करावे, अशी मागणी आयोगाकडे केली. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी हे आवश्यक असल्याचे भाजपने म्हटले आहे.

Back to top button