Himachal Pradesh political crisis : ‘हिमाचल’मधील सरकार लवकरच कोसळेल : बंडखोर आमदारांचा दावा | पुढारी

Himachal Pradesh political crisis : 'हिमाचल'मधील सरकार लवकरच कोसळेल : बंडखोर आमदारांचा दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : “मुख्‍यमंत्री सुखविंदर सिंग सुक्‍खू आमदारांचा अपमान करतात. आमदारांची कोणतीही कामेही होत नाही. राज्‍यात काँग्रेसचे नाही तर सुक्‍खू यांच्‍या मित्रांचे सरकार आहे. हिमाचल प्रदेशमध्‍ये सर्व काही सुरुळीत नाही. आम्‍ही याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींना कळवले आहे, असे स्‍पष्‍ट करत आम्‍ही आमच्‍या तक्रारी वारंवार सांगितल्‍या मात्र कोणताही परिणाम झाला नाही. आमच्‍यावर करण्‍यात आलेल्‍या अपात्रता कारवाईविरोधात आम्‍ही न्‍यायालयात जाणार आहोत. सर्व आमदार या सरकारवर प्रचंड नाराज आहेत. येणाऱ्या काळात खूप काही घडणार आहे. हिमाचल प्रदेशमधील सुक्‍खू यांचे सरकार लवकर कोसळेल, असा दावा काँग्रेसचे बंडखोर आमदार राजिंदर राणा यांनी आज (दि.२) मार्च माध्‍यमांशी बोलताना केला. ( Himachal Pradesh political crisis )

आम्‍ही हिमाचल प्रदेशचा स्‍वाभिमान जपला…

या वेळी राणा म्‍हणाले की, राज्यसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमधून उमेदवार उभा करण्याची मागणी आम्ही सर्वांनी केली होती. आता नऊ आमदारांनी हिमाचल प्रदेशचा स्वाभिमान जपत हिमाचल प्रदेशातील एका व्यक्तीला राज्यसभेवर पाठवले आहे. गेल्या दीड वर्षापासून राज्याची काय स्थिती आहे? परीक्षा देऊन तरुण रस्त्यावर बसले आहेत, त्यांचा निकाल जाहीर होत नाही. राज्यातील जनतेला दिलेले हमीभाव पाळले जात नाहीत. केवळ मुख्‍यमंत्री सुक्‍खू यांच्‍या मित्रांची कामे केली जात आहेत. आमदारांचा अपमान होत आहे, असा दावाही राणा यांनी केला. ( Himachal Pradesh political crisis )

सुक्‍खू देशातील सर्वाधिक खोटे बोलणारे मुख्‍यमंत्री

हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसचे ९ आमदार मुख्यमंत्री सक्‍खू यांच्यावर नाराज आहेत. याआधीही आम्ही काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींना याबाबत सांगितले होते की, हिमाचल प्रदेश वाचवायचा असेल तर सुक्‍खू यांना मुख्यमंत्री पदावरून हटवावे लागेल. मात्र आमचं पक्षश्रेष्‍ठींनी ऐकले नाही. हिमाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री हे भारतातील सर्वात खोटे बोलणारे मुख्यमंत्री आहेत, असा आरोपही त्‍यांनी केला. ( Himachal Pradesh political crisis )

बंडखोर आमदारांचा निर्णय विचारपूर्वकच

बंडखोर आमदार आमच्याशी संपर्क साधत आहेत. त्यांना परत यायचे आहे, असा दावा काँग्रेसकडून केला जात आहे; पण हा दावाच खोटा आहे. कोणालाही सुक्‍खू यांच्‍याबरोबर जायचे नाही. सर्व आमदारांनी विचारपूर्वकच बंडखोरीचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना काळा साप असे म्‍हटले आहे. यावर जनता न्यायालय निर्णय देईल. आम्ही हिमाचलची ओळख, लोक आणि हित यांच्यासोबत आहोत, असेही ते म्‍हणाले.

येणाऱ्या काळात खूप काही घडणार आहे

विक्रमादित्य हे राजा वीरभद्र सिंह यांचे पुत्र आहेत हे संपूर्ण देशाला माहीत आहे. सीएम सुखू यांनी वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबीयांचा आणि समर्थकांचा अपमान केला आहे. हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. शनिवारी विक्रमादित्य यांनी सर्व आमदारांची भेट घेतली. सर्व आमदार या सरकारवर प्रचंड नाराज आहेत. येणाऱ्या काळात खूप काही घडणार आहे. हिमाचल प्रदेशातील सुखू सरकार लवकरच पडणार आहे, असा दावाही त्‍यांनी केला.

 

Back to top button