Russia Ukraine Conflict : रशियाच्या विविध भागात 20 भारतीय अडकले : परराष्ट्र मंत्रालय | पुढारी

Russia Ukraine Conflict : रशियाच्या विविध भागात 20 भारतीय अडकले : परराष्ट्र मंत्रालय

पुढारी ऑनलाईन डेस्क : Russia Ukraine Conflict : चांगल्या नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून रशियात नेलेले 20 भारतीय नागरिक तेथील युद्ध परिस्थितीत अडकले आहेत. या लोकांनी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. त्यांना परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यासाठी भारताकडून रशियन अधिकाऱ्यांशीही चर्चा सुरू आहे,’ अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रणधीर जयस्वाल म्हणाले की, ‘20 भारतीय नागरिक रशियाच्या विविध भागात अडकले आहेत. या लोकांसोबत रशियन सैन्यात मदतनीस म्हणून काम करण्याचा करार करण्यात आला होता. नंतर त्यांना युद्धासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी भारतीय दूतावास रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. दरम्यान, आम्ही सर्व भारतीयांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आणि युद्धापासून दूर राहण्याचे आवाहन करतो,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

‘काही दिवसांपासून रशियन सैन्यात भरती झालेले अनेक भारतीय परत येण्याची मागणी करत असल्याच्या बातम्या येत होत्या. आम्ही ही बाब रशियन सरकारकडे मांडली. यानंतर रशियन लष्करातून अनेक भारतीयांना सोडण्यात आले आहे. भारतीयांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे,’ असे रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिका स्पष्ट आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताने नेहमीच चर्चा केली आहे. दोन्ही बाजूंनी यावर एकत्र येऊन शांततेसाठी उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. भारताची पहिल्या दिवसापासून हीच भूमिका राहिली, असेही जयस्वाल यांनी सांगितले.

कतारमधून 8 पैकी 7 भारतीय नागरिकांना सोडण्यात आले

कतारहून परतलेल्या माजी नौसैनिकांबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, दाहरा ग्लोबल प्रकरणात सात भारतीयांना सोडण्यात आले आहे, जे भारतात परतले आहेत. आठव्या भारतीय नागरिकांसाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील. त्या पूर्ण झाल्यावर ही व्यक्तीही भारतात परत येईल.

Back to top button