नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ सुरू झालेल्या शेतकरी आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. यावेळी शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, एमएसपीसह शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. दिल्लीच्या सीमेवर बसून आज एक वर्ष पुर्ण होत आहे. (kisan leader rakesh tikait)
सरकारने हे तीनही 'काळे कायदे' मागे घेण्याची घोषणा केली असली तरी किमान आधारभूत किंमतीसह इतर अनेक मुद्द्यांवर सरकारने मौन बाळगले आहे. या प्रश्नावर सरकार शेतकऱ्यांशी बोलत नाही. तसेच शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी दिल्लीच्या सीमा सोडणार नाहीत. अशा थेट इशारा राकेश टिकैत यांनी दिला.
टिकैत म्हणाले की, २७ नोव्हेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाची बैठक असून त्या बैठकीत सर्व मुद्दे मांडले जातील. त्यानंतर शेतकरी आंदोलनाची पुढील रणनीती ठरवली जाईल. २९ नोव्हेंबर रोजी शेतकरी संसदेसमोर ट्रॅक्टर मोर्चा काढणार असून आता शेतकरी शांत बसणार नाहीत.
सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असेल, पण MSP वर हमी कायदा सुरवातीपासून आहे, त्याबाबत सरकारने अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन अजून संपणार नाही.
राकेश टिकैत यांनी ट्विटमध्ये म्हटले की, एक वर्षाचा संघर्ष, अतुलनीय आहे थोडं सुख, थोडं दु:ख, आहे पण आम्ही लढत आहोत, जिंकत आहोत, लढणारच, जिंकणारच, किमान आधारभूत मुल्याचा कायदा, शेतकऱ्यांचा हक्क आहे.
दिल्लीला जाणार आहोत आणि शेतकर्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तर तिथेच आम्ही धरणे धरू. आम्ही निम्मी लढाई जिंकली आहे. त्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे टिकैत म्हणाले. एमएसपी कायदा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून जोपर्यंत हा कायदा सरकार आणत नाही, तोपर्यंत शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलनाच्या पावित्र्यात राहतील असे ते म्हणाले.
सरकारला एक खुले पत्र लिहले यावर अद्याप ही सरकारने उत्तर दिलेले नाही. हे सर्व मुद्दे संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत उपस्थित केले जाणार आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलनाची दिशा नेमकी कशी ठरवायची याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चा घेणार असल्याचे टिकैत म्हणाले.
शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात गेले वर्षभर सातत्याने आंदोलन करत आहेत. थंडी, उन्हाळा आणि पावसात ते वर्षभरापासून रस्त्यावर आंदोलन करत आहेत. या दरम्यान सुमारे ७५० आंदोलक शेतकरी शहीद झाले आहेत. या प्रश्नांबाबत दिल्लीच्या चारही सीमेवर हजारो लोक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.
शेतकऱ्यांनी संसद मोर्चाची घोषणा केल्यावर आज (दि.२६) शुक्रवारीच दिल्लीच्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. सर्व सीमांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तपासाशिवाय कोणालाही दिल्लीत प्रवेश देऊ नये, असे सक्त आदेश सीमेवर तैनात असलेल्या पोलिसांना देण्यात आले आहेत.
यूपीच्या सीमेवर किसान आंदोलनाच्या ठिकाणी महापंचायतीसाठी पीएसीच्या ५ बटालियन, लोकल पोलिसांचे २५० कर्मचारी, एलआययू, गुप्तचर आणि महिला पोलिस तैनात करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधिक्षक ज्ञानेंद्र सिंह यांच्या माहितीनूसार, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर संपूर्ण सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. संशयितांवर नजर ठेवण्यासाठी सिव्हिल ड्रेसमधील पोलिस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.
द्रुतगती मार्गावर दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडिंग केले आहे. याचबरोबर दिल्ली पोलिसांनी बॅरिकेडिंगजवळ चेतावणी देणारे पोस्टर लावले आहेत, कलम १४४ लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.