Farmers Protest Delhi : शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत बंदोबस्त वाढला, लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद | पुढारी

Farmers Protest Delhi : शेतकरी आंदोलनामुळे दिल्लीत बंदोबस्त वाढला, लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : Farmers Protest Delhi : शेतकरी आंदोलन उग्र होण्याच्या शक्यतेमुळे दिल्लीच्या सीमांवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मध्य दिल्लीत मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दलांना तैनात करण्यात आले आहे. तर, सुरक्षेच्या कारणांमुळे ऐतिहासिक लाल किल्ला परिसर तात्पुरता बंद करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी टिकरी बॉर्डरवर जाऊन बंदोबस्ताची पाहणी केली.

शेतकरी संघटनांच्या ‘दिल्ली चलो’ निषेध मोर्चातील एका गटाने अंबाला येथील शंभू सीमेवरील अडथळे उधळून लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर हरियाना पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे वातावरण तापले आहे. या परिस्थिती मध्ये, शेतकरी संघटनांशी सरकारने चर्चेचे दरवाजे खुले ठेवले असले तरी दिल्लीच्या दिशेने निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा पाहता आंदोलन चिघळल्यास मागच्यासारखी त्याची झळ राष्ट्रीय राजधानीला बसू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. शेतकरी संघटनांचा दिल्लीत प्रवेश रोखण्यासाठी सिंघू, टिकरी आणि गाझीपूर सीमा बंद करण्यासाठी अनेक टप्प्यांत अडथळे उभारण्याबरोबरच पोलीस आणि निमलष्करी दलांची मोठी तैनाती करण्यात आली आहे. शिवाय, काही प्रमुख मार्गांवर अडथळे उभारण्यासाठी बुलडोझर, काटेरी तार यासारखी व्यवस्थाही करण्त आली आहे.

याअंतर्गत मेट्रो स्थानकांवरील प्रवाशांची वर्दळ नियंत्रित करण्यासाठी स्थानकांचे काही दरवाजे बंद ठेवणे, संवेदनशील पर्यटन स्थळे बंद करणे यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव काल रात्री ऐतिहासिक लाल किल्ला परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात आला. पुढील आदेशापर्यंत हा परिसर बंद राहील असे सांगण्यात आले. तसेच दिल्ली मेट्रोच्या राजीव चौक, मंडी हाऊस, केंद्रीय सचिवालय, पटेल चौक, उद्योग भवन, जनपथ आणि बाराखंबा रोड तसेच खानमार्केट या स्थानकांवरील काही प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले आहेत.

Back to top button