Bharat Ratna | माजी पंतप्रधान चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव यांच्यासह एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न | पुढारी

Bharat Ratna | माजी पंतप्रधान चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव यांच्यासह एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न

पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारने शुक्रवारी देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव आणि भारताच्या हरितक्रांतीचे जनक कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची घोषणा केली. याबाबतची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि समाजवादी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर केला होता.

”देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात येत आहे हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी समर्पित आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असोत वा देशाचे गृहमंत्री आणि आमदार म्हणूनही त्यांनी राष्ट्र उभारणीला नेहमीच गती दिली. आणीबाणीच्या विरोधातही ते ठामपणे उभे राहिले. त्यांचे आमच्या शेतकरी बंधू-भगिनींप्रती असलेले समर्पण आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीप्रती असलेली त्यांची बांधिलकी संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.” असे पीएम मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

”आपले माजी पंतप्रधान श्री पीव्ही नरसिंह राव यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात येणार आहे हे सांगताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंह राव यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळत देशसेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, तसेच अनेक वर्षे खासदार आणि विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनविण्यात, देशाच्या समृद्धी आणि विकासासाठी भक्कम पाया घालण्यात महत्त्वपूर्ण ठरले. नरसिंह राव यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाळ महत्त्वपूर्ण उपाययोजनांद्वारे चिन्हांकित होता ज्यांनी भारताला जागतिक बाजारपेठांसाठी खुले केले आणि आर्थिक विकासाच्या नवीन युगाला चालना दिली.” अशा शब्दांत पीएम मोदी यांनी पीव्ही नरसिंह राव यांच्या कार्याला उजाळा दिला आहे.

देशातील कृषी आणि शेतकरी कल्याणासाठीच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल एमएस स्वामीनाथन यांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करत आहे ही आनंदाची गोष्ट असल्याचे पीएम मोदी यांनी म्हटले आहे. आव्हानात्मक काळात भारताला कृषी क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी मदत करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि देशातील शेतीच्या आधुनिकीकरणासाठी सर्वोच्च प्रयत्न केले. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीचा चेहरा बदलला नाही तर देशाची अन्नसुरक्षा आणि समृद्धीही सुनिश्चित केली, असे पीएम मोदी यांनी नमूद केले आहे.

Back to top button