National Voters’ Day : पुढील २५ वर्षे तुमच्यासाठी आणि भारतासाठीही महत्त्वाची : पंतप्रधान | पुढारी

National Voters' Day : पुढील २५ वर्षे तुमच्यासाठी आणि भारतासाठीही महत्त्वाची : पंतप्रधान

 पुढारी ऑनलाईन डेस्क : सुमारे ५,८०० ठिकाणांहून मोठ्या संख्येने डिजिटल माध्यमातून जोडलेल्या सर्व नवीन मतदारांचे मी मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो. आपल्या सर्वांसमोर एक अतिशय महत्त्वाचे ध्येय आहे ते म्हणजे सक्षम भारत, आत्मनिर्भर भारत, विकसित भारत. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची क्षमता जगाने पाहिली आहे आणि ते ओळखलेही आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आपण सक्षम भारत, आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत राहू. असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय मतदार दिननिमीत्ताने मतदारांशी (Namo Navmatdata Sammelan) बोलत असताना केले.  (National Voters’ Day)

National Voters’ Day : जगातील सर्वात मोठ्या लोकशाही…

मतदार दिनानिमीत्त बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “सुमारे ५,८०० ठिकाणांहून मोठ्या संख्येने डिजिटल माध्यमातून जोडलेल्या सर्व नवीन मतदारांचे मी मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो. इतक्या तरुणांशी संवाद साधण्याची माझ्या आयुष्यातील ही पहिलीच संधी आहे आणि जगातील कोणत्याही राजकारण्यासाठी ही कदाचित पहिलीच संधी आहे. सर्व नवीन मतदारांना मी सलाम करतो. १८ ते २५ या दरम्यानचे वय असे असते की एखाद्याचे जीवन अनेक बदलांचे साक्षीदार असते. या बदलांमध्ये तुम्हा सर्वांना मिळून आणखी एक जबाबदारी पार पाडायची आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत सहभागी होण्याची ही जबाबदारी आहे.

ही वेळ  दोन कारणांसाठी खूप महत्वाची आहे. प्रथम, तुम्ही सर्वजण अशा वेळी मतदार झाला आहात जेव्हा भारताचा अमृत काल सुरू झाला आहे. दुसरे म्हणजे, उद्या २६ जानेवारीला देश आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करेल. पुढील २५ वर्षे तुमच्यासाठी आणि भारतासाठीही महत्त्वाची आहेत.आज जेव्हा देश २०४७ पर्यंत विकसित भारत बनण्याच्या ध्येयावर काम करत आहे, तेव्हा भारताची दिशा काय असेल हे तुमचे मत ठरवेल. १९४७ च्या २५ वर्षांपूर्वी देशाला स्वतंत्र करण्याची जशी जबाबदारी भारतातील तरुणांवर होती, त्याचप्रमाणे २०४७  पर्यंत म्हणजेच २५ वर्षात विकसित भारत घडवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे.

Namo Navmatdata Sammelan : तुमचे एक मत…

तुमचे एक मत भारतातील सुधारणांच्या गतीला आणखी गती देईल. तुमचे एक मत डिजिटल क्रांतीला अधिक ऊर्जा देईल. तुमचे एक मत भारताला स्वबळावर अवकाशात घेऊन जाईल. तुमचे एक मत भारताची विश्‍वासार्हता वाढवेल. तुमचे एक मत आणि देशाच्या विकासाची दिशा एकमेकांशी जोडलेली आहे. तुमचे एक मत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवेल. तुमचे एक मत भारतात स्थिर आणि मोठ्या बहुमताचे सरकार आणेल. स्थिर सरकार असेल तर देश मोठे निर्णय घेतो, अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवतो आणि पुढे जातो.

पूर्ण बहुमत असलेल्या आमच्या सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवून अनेक दशकांची प्रतीक्षा संपवली, आमच्या सरकारने पूर्ण बहुमताने लष्करातील जवानांसाठी वन रँक, वन पेन्शन लागू करून देशाच्या माजी सैनिकांची चार दशकांची प्रतीक्षा संपवली. आपल्याकडे पूर्ण बहुमत असलेले सरकार आहे ज्याने नारी शक्ती वंदन कायदा करून देशातील महिलांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपवली,  आमच्या सरकारनेच तिहेरी तलाक कायदा करून मुस्लिम भगिनी आणि मुलींना न्याय मिळण्याची आशा वाढवली आहे. हे आमचे सरकार आहे ज्याने तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले. हे आमचे सरकार आहे ज्याने SC, ST, OBC यांचे हित जपत गरीब तरुणांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद केली.आमच्या सरकारलाच अयोध्येत राम लल्लाचा अभिषेक पाहण्याची संधी मिळाली.

तरुणांचे भविष्य अंधकारमय…

१०-१२ वर्षांपूर्वी भारतात ज्या प्रकारची परिस्थिती होती त्यामुळे देशातील तरुणांचे भविष्य अंधकारमय झाले होते. आज देशात रोजगाराच्या संधी सातत्याने वाढत आहेत. पूर्वी भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या बातम्या रोजच मथळ्या बनत असत. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे सर्रास झाले. त्या अंधकारमय परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यात यश आल्याचे आम्हाला समाधान आहे. आज भ्रष्टाचाराचा नाही तर विश्वासार्हतेचा आहे. आज आपण यशोगाथांबद्दल बोलतो, घोटाळ्यांबद्दल नाही. २२ जानेवारी रोजी सरकारने सोलारशी संबंधित एक मोठी योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत देशातील एक कोटी घरांमध्ये सोलर रूफटॉप बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे वीजबिल तर कमी होईलच, पण त्यातून निर्माण होणारी वीजही सरकार खरेदी करेल. तुमची शक्ती आणखी वाढू दे, तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो. म्हणूनच आमचे सरकार रात्रंदिवस काम करत आहे.आम्ही नेहमीच देशातील तरुणांवर सर्वाधिक विश्वास ठेवला आहे.

हेही वाचा 

Back to top button