मी मंदिरात जावे असे ‘त्यांना’ वाटत नाही; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा | पुढारी

मी मंदिरात जावे असे 'त्यांना' वाटत नाही; राहुल गांधींचा मोदींवर निशाणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी सध्या आसाममध्ये आहेत. आसाममध्ये संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान बटाद्रवा थान येथे मंदिरात जाण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. यापूर्वी मंदिरात जाण्याची परवानगी होती, पण आज ती नाकारली जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मंदिर समितीने मात्र त्यांना दुपारी ३ नंतर भेट देण्यास सांगितले आहे.

अयोध्या राम मंदिराचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा संपल्यानंतर मंदिराला भेट देण्यास सांगितल्याने राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी आसामच्या नागावमध्ये धरणे आंदोलन सुरू केले आहे.

काँग्रेसकडून भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असून ती आसामच्या नागाव जिल्ह्यात पोहोचली आहे. येथील बटाद्रवा ठाण परिसरात संत श्रीमंत शंकरदेव यांचे जन्मस्थान आहे. ठरलेल्या कार्यक्रमानुसार राहुल गांधी आज शंकरदेव मंदिरात जाणार होते, मात्र माध्यमांशी बोलताना राहुल गांधींनी आरोप केला आहे की, आज त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे. आम्हाला मंदिरात जायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले. मी काय गुन्हा केला आहे की मी मंदिरात जाऊ शकत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

मंदिर समितीने ३ वाजल्यानंतर येण्यास सांगितले

मंदिराच्या व्यवस्थापन समितीने रविवारीच राहुल गांधींना सोमवारी दुपारी ३ नंतर येण्याची माहिती दिली होती. व्यवस्थापकीय समितीचे प्रमुख जोगेंद्र देव महंत म्हणाले की, ‘राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त अनेक संस्थांनी मंदिर परिसरात भक्ती कार्यक्रम आयोजित केले आहेत. यावेळी मोठ्या संख्येने लोक मंदिरात येणार आहेत, त्यामुळे राहुल गांधी यांना दुपारी ३ नंतर मंदिरात येण्यास सांगण्यात आले आहे.

Back to top button