पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदाची धुरा दिली जाईल, असे अंदाज व्यक्त होत होते. अखेर पक्षश्रेष्ठींनी शिवराजसिंह चौहान यांचा पत्ता कट करत मुख्यमंत्रीपदी मोहन यादव यांची नियुक्ती केली. या धक्कातंत्राने शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) नाराज असल्याची चर्चा होती. मंगळवारी बुधनी जिल्ह्यातील शहागंज येथे त्यांनी आपल्या मनातील नाराजीला वाट करुन देत एक सूचक विधान केले.
माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान बुधनी येथील शहागंज येथे गेले होते. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी शिवराजसिंह चौहान आपली नाराजी लपवू शकले नाहीत. ते म्हणाले की, "मुख्यमंत्रीपद कुणालाही मिळू शकते; पण मामा-भाऊ ही पदे पद कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. त्याचवेळी राज्याभिषेकानंतर वनवासात जाणे हेही मोठे उद्दिष्ट असेल." त्यांच्या या सूचक आणि भावनिक विधानाची जोरदार चर्चा मध्ये प्रदेशच्या राजकारणात होत आहे.
यावेळी शिवराजसिंह चौहान म्हणाले की, "मी कधीच तुम्हाला अंतर देणार नाही. लहान मुले कधी सभेला येतात का, मात्र ती मामासाठी आली होती. भविष्यात बहिणींच्या योजनाही सुरू राहतील. पुतण्या-पुतण्यांच्या कल्याणात कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. गरीब असो वा शेतकरी, आम्ही सांगितले तेच करू."
शिवराज सिंह म्हणाले, काळजी करू नका, माझे आयुष्य तुमच्यासाठी, जनतेसाठी, माझ्या बहिणींसाठी, माझ्या भाचा-भाचींसाठी आहे. तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण राहू देणार नाही म्हणून मी या पृथ्वीवर आलो आहे. तुम्हाला सोडून मी कुठेही जाणार नाही, असे भावनिक विधानही त्यांनी यावेळी केले.