राहुल गांधींची आता ‘भारत न्याय यात्रा’ | पुढारी

राहुल गांधींची आता ‘भारत न्याय यात्रा’

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा दुसरा टप्पा 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या टप्प्याचे नाव ‘भारत न्याय यात्रा’ असेल. वांशिक हिंसाचाराने होरपळलेल्या मणिपूरमधून यात्रेला प्रारंभ होऊन 20 मार्चला मुंबईमध्ये समारोप होणार आहे. ही यात्रा पायी आणि वाहनाने प्रवास करून पूर्ण केली जाणार आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे इंफाळमध्ये 14 जानेवारीला यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. 6,200 किलोमीटरची ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र अशा 14 राज्यांमधून जाणार आहे. ही माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ आणि माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी बुधवारी दिली.

‘भारत जोडो’ यात्रेचा पहिला टप्पा कन्याकुमारी ते काश्मीर (दक्षिण भारत ते उत्तर भारत) असा होता. ‘भारत जोडो’ यात्रेचा पहिला टप्पा 4,500 किलोमीटरचा होता. ती यात्रा 12 राज्यांमधून गेली होती. आता ‘भारत न्याय यात्रा’ पूर्व भारत ते पश्चिम भारत असेल आणि ‘भारत न्याय यात्रा’ देशातील जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्यासाठी असेल, असा दावा काँग्रेसने केला आहे.

अशी असेल यात्रा

14 जानेवारी ते 20 मार्च
मार्ग ः इंफाळ (मणिपूर) ते मुंबई
एकूण अंतर ः 6,200 कि.मी.
चौदा राज्यांचा समावेश ः मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र.

Back to top button