BJP On AAP : केजरीवाल सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले : भाजप | पुढारी

BJP On AAP : केजरीवाल सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मोडले : भाजप

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक विक्रम केले आहेत. आर्थिक गैरव्यवहार करणे हे अरविंद केजरीवाल सरकारचे वैशिष्ट्य आहे. आम आदमी पक्षाच्या लोकांचे नेतृत्व, व्यक्तिमत्व सगळंच बनावट आहे. भ्रष्टाचार आणि प्रदूषण मात्र खरे आहे, असा सनसनाटी आरोप औषधीतील गैरव्यवहारांवरून भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. तर दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. BJP On AAP

दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि खासदार मनोज तिवारी यांनी दिल्लीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा एका अहवालाचा दाखला देत म्हणाले की, दिल्ली सरकारच्या वतीने शासकीय रुग्णालय तथा मोहल्ला क्लिनिकमध्ये दिली जाणारी औषधे दुय्यम दर्जाची आहेत. लोकांच्या आयुष्याचा खेळ मांडून मुख्यमंत्री मात्र विपश्यना करण्यासाठी रवाना झाले आहेत. हृदय रोगावर दिली जाणारे औषधेही दुय्यम दर्जाची आहेत. मद्य आर्थिक गैरव्यवहार, दिल्ली जल बोर्ड आर्थिक गैरव्यवहार, मुख्यमंत्री निवासस्थानात गैरव्यवहार, बसेसमध्ये गैरव्यहार या मालिकेत आता सरकारद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधांमध्ये असलेला गैरव्यवहार जोडला आहे. BJP On AAP

शासकीय दवाखान्यांसह मोहल्ला क्लिनिकमध्ये देण्यात येणाऱ्या दुय्यम औषधांप्रकरणी आरोग्यमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, ही भाजपची मागणी आहे. त्यांनी राजीनामा दिला नाही, तर भारतीय जनता पक्ष दिल्लीत जनआंदोलन उभे करेल, असेही ते म्हणाले. तसेच दिल्लीची विधानसभा म्हणजे विधानसभा नसून आम आदमी पक्षाची कार्यशाळा असते, असाही आरोप त्यांनी केला.

यावेळी बोलताना दिल्ली भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार मनोज तिवारी यांनीही दिल्लीतील केजरीवाल सरकारवर टीकेची झोड उठवली. आपल्या राजकीय आयुष्यात कुठल्याही पक्षाचा उदय होऊन कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त गैरव्यवहार करण्याचा विक्रम आम आदमी पक्ष आणि दिल्ली सरकारकडे आहे. काही वर्षांपूर्वी अरविंद केजरीवाल म्हणत होते की जेव्हा कोणतेही नेते तपास यंत्रणांच्या नोटीसीला उत्तर देत नाहीत तेव्हा मला लाज वाटते. मात्र आता तेच केजीवाल इडी समोर जायला घाबरतात. मग त्यांना काय म्हणायचे असा प्रश्नही त्यांनी विचारला. तसेच आम आदमी पक्षाच्या लोकांचे व्यक्तिमत्व, नेतृत्व आणि सर्वच बनावट आहे. केवळ प्रदूषण आणि भ्रष्टाचार मात्र खरे आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा 

Back to top button