भाजप प्रत्येक निवडणूक जिद्दीने लढतो : पी. चिदम्बरम

भाजप प्रत्येक निवडणूक जिद्दीने लढतो : पी. चिदम्बरम

कोलकाता; वृत्तसंस्था : छत्तीसगड आणि राजस्थानातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नुकताच झालेला पराभव ही अनपेक्षित आणि चिंतेची बाब आहे. कोणतीही निवडणूक भाजप शेवटची असल्याप्रमाणे लढतो, हे विरोधी पक्षांनी ओळखायलाच हवे. आगामी लोकसभा निवडणुकीचा कलही भाजपच्या बाजूनेच असल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदम्बरम यांनी 'पीटीआय'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केले आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री असलेले चिदम्बरम म्हणाले की, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत विधानसभा निवडणुका जिंकल्याने भाजपला 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोठी ताकद मिळाली आहे. भाजपने सर्वच निवडणुका जिद्दीने लढल्या. छत्तीसगड व राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव अनपेक्षित होता. हा निकाल काळजी करण्यासारखा असून पक्षश्रेष्ठी उणिवा दूर करतील, असा विश्वास मला वाटतो. छत्तीसगड, राजस्थानसह मध्य प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांत काँग्रेसने 40 टक्के मतांचा वाटा कायम राखला. शेवटच्या मैलापर्यंतचा प्रचार, बूथ व्यवस्थापन आणि निष्क्रिय मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणणे या गोष्टी इंडिया आघाडीसाठी महत्त्वाच्या आहेत. सध्या भाजपला वातावरण अनुकूल असले तरी वार्‍याची दिशा बदलू शकते. मुख्य म्हणजे भाजप कोणतीही निवडणूक कधीच सहजतेने घेत नाही. प्रत्येक निवडणूक शेवटची असल्याप्रमाणे भाजप लढतो. विरोधी पक्षांनी भाजपची ही लढण्याची जिद्द जाणून घेतली पाहिजे. इंडिया आघाडीने देशातील 400 ते 425 लोकसभा मतदारसंघांत भाजपविरुद्ध लढू शकणार्‍या उमेदवारांना संधी दिली पाहिजे. मात्र, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी केवळ तीनच महिने राहिले आहेत, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

जातनिहाय जनगणना सर्वात महत्त्वाचा विषय नाही

भाजपच्या ध्रुवीकरणाच्या प्रचार काळजी वाटायला लावणारा आहे. काँग्रेसने भाजपला याबाबतीत चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. जातनिहाय जनगणना हा मुद्दा महत्त्वाचा असला तरी तो निर्णायक स्वरूपाचा नाही. त्यापेक्षा बेरोजगारी आणि महागाई हे विषय जास्त महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी नमूद केले. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने जातनिहाय जनगणना हा मुद्दा केंद्रस्थानी असेल, असे म्हटले होते हे येथे उल्लेखनीय.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news