Parliament security breach : संसद सुरक्षा भंग प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक | पुढारी

Parliament security breach : संसद सुरक्षा भंग प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : संसद सुरक्षा भंग प्रकरणानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चिखलफेक सुरु झाली आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणातील आरोपी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या जवळचे आहेत असा गंभीर आरोप भाजपने केला आहे. तर या प्रकरणावर गृहमंत्री संसदेला विश्वासात घेत नाहीत, असा प्रत्यारोप विरोधकांनी केला आहे. महाराष्ट्रातील वकील असीम सरोदे यांनी आरोपी मोल शिंदे याला देऊ केलेली मदत आणि सरोदे यांचे शिवसेना ठाकरे गटाशी असलेले संबंध यावरुनही भाजपने विरोधकांना चांगलेच फटकारले आहे.

संसद सुरक्षा भंग प्रकरणात आरोपी असलेल्या अमोल शिंदेला महाराष्ट्रातील वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर मदत करणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभुमीवर असीम सरोदे यांचे काही फोटो भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमांवर टाकुन संसदेच्या सुरक्षेचा भंग करणारे आणि काँग्रेस यांच्यातील दुवा घट्ट होत चालला आहे, असा खळबळजनक दावा केला. वकील असीम सरोदे हे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. ते काँग्रेसच्या जवळचे असुन उद्धव ठाकरे गटाचे वकीलही आहेत. ज्यांनी संसदेला अपवित्र केले त्यांचा बचाव सरोदेंना करायचा आहे, असे म्हणत मालवीय यांनी यात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा संबंध जोडला आहे.

आरोपींना वैचारिकदृष्ट्या काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी (एम) आणि तृणमूल काँग्रेस सारखे पक्ष जवळचे वाटतात. त्यांच्या बचावासाठी पुढे आलेले वकील देखील याच इकोसिस्टीमचा भाग आहेत. आरोपी ललित झा हा तृणमूल काँग्रेस सोबत संबंधित आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसोबतचे त्याचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले आहेत. या आरोपींचे काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि तृणमूल काँग्रेसशी संबंध असल्याचे आढळले आहे. हताश झालेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीने हा हल्ला घडवला का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दरम्यान अमित मालवीय आणि बंगालमधील भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी ललित झा या आरोपीचे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांसोबत असलेले काही फोटो देखील माध्यमांसमोर आणले आहेत. तर संसदेच्या सुरक्षा भंगाच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष राजकारण करत आहे, अशी टीका केली आहे. तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. आणि ज्यांनी हे देशविरोधी कृत्य केले त्यांना शिक्षा भोगावी लागेल, असेही त्या म्हणाल्या. याच मुद्द्यावरुन भाजपचे राज्यसभा खासदार राकेश सिन्हा यांनी देखील विरोधी पक्षांवर तोफ डागली आहे. विरोधी पक्षाची लोक संसदीय लोकशाहीचा पाया कमकुवत करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या प्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात बोलायला पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच या विषयावर चर्चा करण्याची मागणी करताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, गुरुवारी १४ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. जे खासदार या गंभीर मुद्द्यावर चर्चेची मागणी करतात त्यांचे निलंबन करणे आणि ज्यांनी घुसखोरांना संसद प्रवेशाचे पास दिले त्या खासदारावर कुठलीही कारवाई न करणे हे योग्य नाही. असा पवित्रा विरोधी पक्षाच्या खासदारांनी घेतला आहे. संसद सुरक्षा भंग हे प्रकरण मोठे नाही असे सरकारतर्फे सुरुवातीला दर्शवण्यात आले होते. मात्र या प्रकरणातील आरोपींवर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ही बाब यातील गांभीर्य दर्शवते. असे असताना गृहमंत्री यावर संसदेत का बोलत नाहीत आणि घुसखोरांना संसद प्रवेशाचे पास देणारे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात येत नाही, असा प्रतिसवाल कॉंग्रेससह तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि विरोधी पक्षांनी केला आहे.

हेही वाचा

Back to top button