

नवी दिल्ली; पीटीआय : भारतात एप्रिल-मे महिन्यात होऊ घातलेल्या सार्वजनिक निवडणुकीत भाजपला तिसर्यांदा सत्ता मिळणार असल्याचा अंदाज 'फिच' या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने व्यक्त केला आहे.
भारतासह आशियाई देशांमधील राजकीय स्थितीबाबत फिचने अहवाल जारी केला आहे. या अहवालात म्हटल्यानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने राबविलेल्या आर्थिक धोरणांचा प्रभाव जनमानसावर कायम आहे.
भारतात 2014 साली भाजपने सत्ता स्थापन केली. त्यानंतर 2019 साली पुन्हा भाजपने निर्णायक बहुमत मिळवून दुसर्यांदा सत्ता संपादन केली आहे. 2024 मध्ये भारतात एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. प्रस्थापित सरकारच्या आर्थिक धोरणांची भुरळ लोकांवर पडली आहे. त्यामुळे भाजपचीच पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. भाजपची तिसर्यांदा सत्ता आल्यास धोरण सातत्य कायम राहण्यास मदत होणार आहे.
फिचने भाजपला ट्रिपल बी (बीबीबी/स्टेबल) असे मानांकन दिले आहे. बांगला देशात मात्र सत्ताधारी सरकारला फटका बसण्याची शक्यताही यामध्ये वर्तविण्यात आली असून या देशाला बीबी/निगेटिव्ह असा शेरा दिला आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांच्या अर्थव्यवस्थेचा डोलारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मदतीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या सत्ताधारी सरकारला निवडणुकीत लाभ मिळण्याची चिन्हे आहेत, असेही यामध्ये म्हटले आहे.