

पुढारी ऑनलाईन डेस्क: मिझोरमधील नवख्या झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाचे (ZPM) नेते लालदुहोमा यांनी आज (दि.८) मिझोरामचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजधानी ऐजॉल येथील राजभवन संकुलात आज सकाळी ११ वाजता मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडला. यावेळी मिझोरमचे राज्यपाल हरी बाबू कंभामपती उपस्थित होते. (Mizoram CM Oath)
झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाने राज्यातील विधानसभेच्या ४० पैकी २७ जागा जिंकून मिझो नॅशनल फ्रंट पक्षाचा पराभव केला. मिझोराम विधानसभा निवडणुकीत नवख्या झोरम पीपल्स मूव्हमेंट पक्षाने विधानसभेत चमकदार कामगिरी केली. त्यानंतर बुधवारी (दि.६) त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. यानुसार आज राज्यपाल हरी बाबू कंभामपती यांनी राजधानी ऐजॉल येथील राजभवन संकुलात मुख्यमंत्री लालदुहोमा आणि इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. (Mizoram CM Oath)
झोराम पीपल्स मूव्हमेंट पार्टी सुरुवातीला सहा प्रादेशिक पक्षांची युती होती. ज्यामध्ये मिझोरम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनलिस्ट पार्टी, झोरम एक्सोडस मूव्हमेंट, झोरम डिसेंट्रलाइजेशन फ्रंट, झोरम रिफॉर्मेशन फ्रंट आणि मिझोराम पीपल्स पार्टी यांचा समावेश होता.
२०१८ मध्ये, ZPM ने याच आघाडीसह निवडणूक लढवली होती आणि आठ जागा जिंकल्या होत्या. यानंतर, निवडणूक आयोगाने (ECI) जुलै २०१९ मध्ये अधिकृतपणे पक्षाची नोंदणी केली. सर्वात मोठा संस्थापक पक्ष, मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स, २०१९ मध्ये युतीतून बाहेर पडला आणि उर्वरित पाच पक्षांनी एकत्र येऊन ZPM नाव दिले.
लालदुहोमा यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९४९ रोजी मिझोराममधील तुळपुई गावात शेतकरी कुटुंबात झाला. चार भावंडांमध्ये ते सर्वात लहान खवजळ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेतले. १९७२ मध्ये त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. संध्याकाळच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. १९७२ ते १९७७ या काळात लालदुहोमा यांनी मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांचे मुख्य सहाय्यक म्हणून काम केले. यानंतर १९७७ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उर्त्तीण झाले. १९७७ मध्ये ते भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) दाखल झाले. त्यांची नियुक्ती गोवा येथे झाली. गोव्यात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. तेथील गुन्हेगारी आणि तस्करांवर धडक कारवाई केली. त्यांची कामगिरी लक्षवेधी ठेली. यामुळे १९८२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा प्रभारी म्हणून त्यांची नवी दिल्ली येथे बदली झाली. त्यांना पोलीस उपायुक्त म्हणून विशेष बढती देण्यात आली. ते राजीव गांधी यांच्या अध्यक्षतेखालील १९८२ आशियाई खेळांच्या आयोजन समितीचे सचिवही होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडे सुरक्षा सेवेतून राजीनामा देऊन, ते 1984 मध्ये मिझोराममधून त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली. ते खासदार म्हणून निवडून आले.