मिचाँग चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले | पुढारी

मिचाँग चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले

चेन्नई; वृत्तसंस्था : बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उसळलेले मिचाँग हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर उत्तरेकडे सरकले आहे. हे चक्रीवादळ तेलंगणात पोहोचताच कमकुवत झाले असल्याची माहिती, भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मिचाँग चक्रीवादळ मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नेल्लोर-मछलीपट्टनम दरम्यानच्या बापटला याठिकाणी धडकले होते. यावेळी ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस झाला. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला बसला.

या दोन्ही राज्यांमध्ये 100 हून अधिक रेल्वे आणि 50 हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 29 एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागातून 9 हजार 500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. मिचाँगमुळे 194 गावे आणि नेल्लोर-मछलीपट्टनम या शहरांतील सुमारे 40 लाख लोकांना फटका बसला तर तर 25 गावांत महापुराचे पाणी घुसले असल्याची माहिती आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. मिचाँग चक्रीवादळामुळे राज्यात दोन दिवसांत 3 महिन्यांचा पाऊस पडला असून चेन्नई शहर पाण्याखाली गेले आणि यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला असल्याचे तामिळनाडूच्या मुख्य सचिवांनी सांगितले.

Back to top button