Baba Balaknath Rajasthan Elections : राजस्थानात बाबा बालकनाथ मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार! जाणून घ्या त्यांच्याबद्दल | पुढारी

Baba Balaknath Rajasthan Elections : राजस्थानात बाबा बालकनाथ मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार! जाणून घ्या त्यांच्याबद्दल

पुढारी ऑनलाईन डेस्क : Baba Balaknath Rajasthan Elections : राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होईल अशी माहिती एक्झिट पोलमधून समोर आली होती. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलने काँग्रेसच्या विजयाचे संकेत दिले होते. पण बहुतांश एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपचा विजय होईल असे म्हटले होते. रविवारी (दि. 3 डिसेंबर) निकालाच्या दिवशीही चित्र स्पष्ट होत आहे. राजस्थानात भाजपने आघाडी मिळवली असून मतदारांनी कमळालाच्या पारड्यात बहुमत दिल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. दरम्यान, राजस्थानात भाजपची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच एक एक धक्कादायक बाब समोर आली असून बाबा बालकनाथ हे भाजपचा सर्वात आवडता चेहरा असल्याची चर्चां रजकारणात रंगली आहे. हे बाबा बालकनाथ कोण आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मुख्यमंत्र्यांबाबत जनतेची पसंती काय आहे हे आधी जाणून घ्या

इंडिया टुडेच्या एक्झिट पोलनुसार अशोक गेहलोत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. या सर्व्हेनुसार 32 टक्के लोकांना गेहलोत यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा होती. तिजारा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार बाबा बालकनाथ दुसऱ्या क्रमांकावर होते. सर्वेक्षणात 10 टक्के लोकांनी त्यांना आपली पसंती दिली होती. आश्चर्याची बाब म्हणजे माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या सर्वेक्षणात तिसऱ्या क्रमांकावर होत्या. 9 टक्के मतदारांनी त्यांना मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिली होती.

कोण आहेत बाबा बालकनाथ? (Baba Balaknath Rajasthan Elections)

बालकनाथ हे सध्या अलवरमधून खासदार आहेत. ते ओबीसी प्रवर्गातून येतात. रोहतकमधील मस्तनाथ मठाचे महंत असणारे बालकनाथ भगवी वस्त्रे परिधान करतात. त्यांचा पोशाख उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखा आहे, म्हणून लोक त्यांना ‘राजस्थानचे योगी’ असेही म्हणतात. राजस्थानमध्ये ते भाजपचे फायरब्रँड नेते मानले जातात आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे ते चर्चेत असतात.

बारावीपर्यंत शिक्षण (Baba Balaknath Rajasthan Elections)

बालकनाथ यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या अर्जानुसार त्यांचे वय 39 वर्षे आहे. त्यांच्याकडे रोख 45 हजार रुपये आहेत. तर नवी दिल्लीतील संसद भवन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत 13 लाख 29 हजार पाचशे पन्नास रुपये (13,29558) येथे जमा आहेत. याशिवाय एसबीआय तिजारा शाखेतील अन्य बँक खात्यात 5 हजार रुपये जमा आहेत. त्यानुसार बँकेत एकूण 13 लाख 79 हजार 558 रुपये जमा आहेत. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे.

बालपणापासून अध्यात्माशी जोडले गेले

महंत बालकनाथ योगी यांचा जन्म 16 एप्रिल 1984 रोजी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील कोहराना गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुभाष यादव आणि आईचे नाव उर्मिला देवी आहे. एकुलत्या एक असाणा-या बालकनाथ यांना आजोबा फूलचंद यादव आणि आजी संतरो देवी यांच्याकडून लोककल्याणाची शिकवण मिळाली. कुटुंबियांनी बालकनाथ यांना वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी महंत खेतनाथ यांच्याकडे अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. तेथे महंत खेतनाथ यांनी बालकनाथ यांना गुरुमुख नाव दिले. येथील अध्यात्मिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बालक नाथ नाथ संप्रदायाचे सर्वात मोठे श्रद्धास्थान असणा-या अस्थल बोहर रोहतकचे महंत चंदनाथ यांच्याकडे हनुमानगढ येथील मठात गेले. तिथे बालसुलभ प्रवृत्ती पाहून महंत चंदनाथ यांनी बालकनाथ असे नामकरण केले. महंत चंदनाथ यांनी 29 जुलै 2016 रोजी त्यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली. महंत बालक नाथ योगी हे हिंदू धर्मातील नाथ संप्रदायाचे आठवे संत आहेत. बालकनाथ योगी हे बाबा मस्तनाथ विद्यापीठाचे कुलपतीही आहेत. (Baba Balaknath Rajasthan Elections)

2019 मध्ये पहिल्यांदा खासदार

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बालकनाथ यांना अलवरमधून तिकीट दिले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते भंवर जितेंद्र सिंह यांचा मोठ्या फरकाने पराभव करून निवडणूक जिंकली. याचबरोबर ते पहिल्यांदाच खासदार झाले. तेव्हापासून बालकनाथ आपल्या वक्तव्यामुळे आणि कृतीमुळे चर्चेत राहिले आहेत. जुलैमध्ये भाजपने त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. अलीकडेच बालकनाथ पोलिस ठाण्यात घुसून राजस्थान पोलिसांच्या डीएसपींना धमकावल्याने प्रसिद्धीझोतात आले.

निवडणुकीला म्हटले ‘भारत-पाकिस्तान सामना’

विधानसभा निवडणुकीदरम्यान बालकनाथ यांनी काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांच्याशी झालेल्या लढतीचे वर्णन भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना असे केले होते. प्रचारादरम्यान त्यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाचे आरोप केले होते. या भागात गुन्हेगारी आणि गरिबी मोठ्या प्रमाणावर आहे, ज्याला काँग्रेसने प्रोत्साहन दिल्याचे त्यांनी म्हटले होते. बुलडोझरवर स्वार होऊनही बालकनाथ यांनी केलेल्या प्रचाराची जोरदार चर्चा झाली होती.

Back to top button