मतांसाठी काँग्रेसकडून लांगूलचालन : अमित शहा | पुढारी

मतांसाठी काँग्रेसकडून लांगूलचालन : अमित शहा

जयपूर; वृत्तसंस्था : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार मतांसाठी लांगूलचालन करीत असल्याने राज्यात जातीय हिंसा भडकत आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. येथील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

ते म्हणाले की, राजस्थानात काँग्रेस सरकारच्या जातीवादी राजकारणामुळे जाती-जातीत हिंसाचार उफाळत आहे. काँग्रेसला केवळ मतांचे राजकारण करायचे आहे. त्यामुळे दंगेखोरांवर कारवाई करण्यात त्यांना अपयश येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत जातीय हिंसाचार उफाळल्याच्या घटना घडल्या आहेत. गेहलोत सरकारमुळेच मंदिरांवर बुलडोझर चढविण्यात आले आहेत. या सरकारने गोशाळांवर कारवाई केली आहे. रेड डायरीच्या माध्यमातून या सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे जनता काँग्रेसला अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही. गेल्या सहा महिन्यांपासून मी राजस्थानातील सामाजिक परिस्थितीची माहिती घेत आहेत. यावेळी जनतेला परिवर्तन हवे आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला नक्की यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

Back to top button