काँग्रेसच्या कुटुंबाबद्दल बोलतो, तो संपूनच जातो : पंतप्रधान मोदी | पुढारी

काँग्रेसच्या कुटुंबाबद्दल बोलतो, तो संपूनच जातो : पंतप्रधान मोदी

जयपूर; वृत्तसंस्था : काँग्रेसमध्ये एका कुटुंबाच्या ध्येयधोरणांबाबत कुणी ब्र जरी काढला तरी तो संपविला जातो. राजेश पायलट यांनी तसे केले होते. आजही त्यांचा मुलगा (सचिन पायलट) त्याबद्दल शिक्षा भोगत आहे. एक कुटुंब सोडले तर काँग्रेसमध्ये कुणालाही किंमत नाही. मल्लिकार्जुन खर्गे हे या पक्षाचे अध्यक्ष आहेत. पण, त्यांचे फोटो फलकांवर वापरले जात नाही. काँग्रेस हा एका कुटुंबाच्या मालकीचा कारखाना आहे, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली.

राजस्थानमधील सागवाडा आणि कोत्री येथे निवडणूक प्रचार सभा त्यांनी घेतल्या. कमळ सोडून इतर कुणालही दिलेले मत काँग्रेसलाच जाईल, असे समजा. भाजपची मते फोडावीत म्हणून इतर लोक काँग्रेसकडूनच उभे करण्यात आलेले आहेत, हे लक्षात घ्या, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे उमेदवारही खर्गे यांचे फोटो फलकावर वापरत नाहीत, कारण खर्गे हे दलित आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधानांनी केला.

आज प्रचाराचा धुरळा बसणार!

गुरुवार हा प्रचाराचा शेवटचा दिवस असून, 25 नोव्हेंबरला राज्यातील 199 जागांसाठी मतदान होणार आहे.

पंतप्रधान म्हणाले…

  • काँग्रेसने पोसलेल्या पेपर लीक माफियांनी राज्यातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले.
  • केंद्र सरकारच्या योजना राजस्थानमध्ये राबवण्यासाठी काँग्रेसला हटवणे आवश्यक आहे.
  • काँग्रेसने सरदार पटेलांचा सातत्याने अपमान केला. आम्ही केवड्यात स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारून त्याचा सूड उगविला.

Back to top button