काँग्रेसची स्वत:ची गॅरंटी नाही, ते काय गॅरंटी देणार? : अमित शहा | पुढारी

काँग्रेसची स्वत:ची गॅरंटी नाही, ते काय गॅरंटी देणार? : अमित शहा

विदिशा; वृत्तसंस्था : काँग्रेसने मध्य प्रदेश हे राज्य एक दरिद्री राज्य करून ठेवलेले होते. भाजपने गेल्या 18 वर्षांत अहोरात्र कष्ट उपसून ते सुजलाम्-सुफलाम् करून दाखवले. गावागावांत पाणी, रस्ते, वीज पोहोचविण्याचे शिवधनुष्य पेलले, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिरोंज (विदिशा) येथील जाहीर सभेत केले. काँग्रेसची स्वत:चीच गॅरंटी नाही आणि काँग्रेस आपल्या आश्वासनांतून जनतेला 5 वर्षांची गॅरंटी देत आहे, याहून मोठा विनोद तो कोणता, असा सवालही शहा यांनी उपस्थित केला.

सोनिया गांधींच्या मनात राहुल गांधी हे पंतप्रधान आहेत, तर कमलनाथ यांच्या मनात त्यांचे पुत्र नकुलनाथ हे मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्या मनात मात्र फक्तक सर्वसामान्य देशबांधव आहे. आम्हाला सामान्य देशबांधवांचे हित जोपासायचे आहे. मध्य प्रदेशसारखे मागासलेले राज्य आम्ही या संस्कृतीतूनच विकासाच्या वाटेवर आणून सोडले, असा दावा शहा यांनी केला.

शहांनी मांडला हिशेब अन् म्हणाले, ‘फर्क देख लो.’

मी बनिया आहे. हिशेबवही सोबत आणली आहे. दहा वर्षे केंद्रात यूपीए सरकार होते. या सरकारने 2004-14 दरम्यान या राज्याला 2 लाख कोटी रुपये दिले, तर मोदींनी आपल्या 9 वर्षांच्या कार्यकाळात 6 लाख 35 हजार कोटी रुपये दिले, असेही शहा यांनी नमूद केले.

Back to top button