नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने मोठे पाऊल उचलत प्रत्येक राज्यात सायबर कमांडो विंग स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार प्रत्येक राज्यात १० सायबर कमांडोंचे विशेष पथक त्या त्या राज्यांच्या पोलीस दलाच्या अखत्यारित काम करणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना पत्र पाठवून याविषयी अवगत केले आहे. देशातील प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशात विशेष दलांची स्थापना करण्यात येणार असून त्यात केंद्रीय सुरक्षा दलांच्या प्रशिक्षित जवानांचाही समावेश असणार आहे. जानेवारी महिन्यात दिल्लीत देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केली होती की, सायबर सुरक्षेच्या धोक्यांचा मुकाबला करण्याची गरज असून त्यासाठी आयटी नेटवर्कचे संरक्षण व गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष प्रशिक्षित पथकांची स्थापना व्हायला हवी. सायबर स्पेस आणि पोलीस व सरकारी संस्थांच्या सायबर सुरक्षाविषयक गरजांचा तो कणा बनून काम करेल.
त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने पंतप्रधानांच्या सुरक्षेनुसार नवी यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावानुसार ही सायबर कमांडो विंग त्या त्या राज्यांच्या पोलीस दलाचा भाग असेल. आयटी सुरक्षा व डिजिटल फॉरेन्सिक या विषयांतील तज्ज्ञ त्यात असतील. प्रत्येक राज्याने प्रारंभी प्रत्येकी १० सायबर कमांडो नेमायचे आहेत. या दलावर नियंत्रण व त्यांचे संचालन राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे, तसेच केंद्रीय पोलीस दलातील उच्च प्रशिक्षित अधिकारी करणार आहेत. गरज पडल्यास खासगी तज्ज्ञांचीही त्यासाठी मदत घेण्यास मुभा देण्यात आली आहे.