भोपाळ; वृत्तसंस्था : कर्नाटकच्या पराभवानंतर भाजपने पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी रणनीती बदलली असून, हिंदी भाषिक राज्यांत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार फोकस न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसर्या यादीत भाजपने विद्यमान मंत्र्यांचा समावेश न करता तीन केंद्रीय मंत्री व काही खासदारांना तिकिटे दिल्याने भाजपने तेथे 'गुजरात पॅटर्न' राबवण्याचे ठरवल्याचे दिसते.
भाजपने सोमवारी मध्य प्रदेश निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीतही विद्यमान मंत्रिमंडळातील एकाही मंत्र्याचा समावेश नसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या आहेत. उलट भाजपने नरेंद्रसिंह तोमर, प्रल्हाद पटेल आणि फग्गनसिंह कुलस्ते या केंद्रीय मंत्र्यांना आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचा समावेश केल्याने भाजपने रणनीती बदलल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत भाजपने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करून विविध राज्यांत निवडणुका लढवल्या होत्या; पण भाजप आता किमान हिंदी भाषिक राज्यांत तरी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा इतक्यातच जाहीर करणार नाही.
भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बसवराज बोम्मई यांचे मुख्यमंत्रिपदासाठी नाव जाहीर करीत रणनीती स्पष्ट ठेवली होती; पण तेथे जबर फटका बसल्यानंतर भाजपने यावेळी बदल केले आहेत. मंत्र्यांची उमेदवारी टांगणीला ठेवत भाजप मध्य प्रदेशात 'गुजरात पॅटर्न' राबवत असल्याचे स्पष्ट झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.