Parliament Special Session | जुन्या संसद इमारतीतून बाहेर पडणे भावूक क्षण : पीएम मोदी | पुढारी

Parliament Special Session | जुन्या संसद इमारतीतून बाहेर पडणे भावूक क्षण : पीएम मोदी

पुढारी ऑनलाईन : जुन्या संसद इमारतीतून बाहेर पडणे हा सर्वांसाठीच भावूक क्षण आहे. या जुन्या इमारतीतील संसद सभागृह सोडताना आमचे मन भावना आणि आठवणींनी भरले आहे. ७५ वर्षांच्या प्रवासाने अनेक लोकशाही परंपरा आणि प्रक्रियांची उत्कृष्ट निर्मिती केली आहे. या सभागृहातील प्रत्येक व्यक्तीने त्यासाठी सक्रिय योगदान दिले आहे आणि ते याचे साक्षीदार राहिले आहेत. आपण नवीन इमारतीत जाऊ पण संसदेची जुनी इमारत नेहमीच येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या विशेष सत्रात संबोधन करताना म्हटले. अमृतकालच्या पहिल्या पहाटेचा प्रकाश, राष्ट्रातील नवा विश्वास, नवा आत्मविश्वास, नवा उत्साह, नवी स्वप्ने, नवे संकल्प आणि राष्ट्राच्या नव्या सामर्थ्याने भरला असल्याचेही ते म्हणाले. (Parliament Special Session)

आजपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. सोमवारी १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे हे विशेष अधिवेशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज (दि.१८ सप्टेंबर) लोकसभेच्या विशेष अधिवेशनाची सुरूवात झाली आहे. संसदेच्या जुन्या सभागृहात आजपासून हे अधिवेशन सुरू होत आहे. जुन्या संसद भवनात पीएम मोदींचे हे शेवटचे भाषण आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी  अधिवेशनाच्या सुरूवातीलाच विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप करत, विरोधकांना शांत करत संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरूवात केली. (Parliament Special Session)

Parliament Special Session : येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देईल: पीएम मोदी

या संसद भवनाचा निरोप घेणे खूप भावनिक आहे. एखादे कुटूंब जेव्हा त्यांचे राहते घर सोडते तेव्हा ते देखील खूप भावनिक होत असते. आपण देखील हे संसद भवन सोडून नवीन इमारतीत जात आहोत तेव्हा मनात भावना दाटून आल्या असल्याचेही पीएम मोदी म्हणाले. नवीन संसद भवनात जाण्यापूर्वी या जुन्या संसदेतील आठवणींचे स्मरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे विशेष अधिवेशनाची सुरूवात  या भवनातून आपण करत आहोत. आपण जरी संसद भवनाच्या नवीन इमारतीत जात असलो तरी देखील संसदेची ही जुनी इमारत येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. हे भारतीय लोकशाहीचा सुवर्ण प्रवास सांगेल, असे पीएम मोदी यांनी सांगितले.

संसदेवरील देशवासियांचा विश्वास अढळ

सभागृहाच्या इतिहासात 7500 हून अधिक लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे दोन्ही सभागृहात योगदान दिले आहे. या काळात सुमारे 600 महिला खासदारांनीही दोन्ही सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे. गेल्या 75 वर्षातील आमची कामगिरी म्हणजे या संसदेवर देशातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास वाढला आहे. या महान संस्थेवर लोकांचा अढळ विश्वास कायम राहो, अशी आशा देखील पीएम मोदी यांनी संसदेत स्पष्ट केले.

भारताने ‘विश्व मित्र’ म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे

चांद्रयान 3 च्या यशाने संपूर्ण देश भारावून गेला आहे आणि भारताची क्षमता, विज्ञान, आधुनिकता आणि देशवासीयांच्या दृढनिश्चयाचा जगावर नवा प्रभाव पडेल. G-20 चे यश हे कोणा एका व्यक्तीचे किंवा पक्षाचे नसून 140 कोटी देशवासियांचे यश आहे. आज भारताने ‘विश्व मित्र’ म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज संपूर्ण जग भारतात आपला मित्र म्हणून शोधत आहे आणि भारताच्या मैत्रीचा अनुभव घेत आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे. यापुढे लोकसभा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली P-20 चे आयोजन करण्यात येणार असून, याला सरकार पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य करेल. त्यांच्या भाषणाने संसदेच्या विशेष अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला.

संसद भवनावरील दहशतवादी हल्ला हा आपल्या आत्म्यावरील हल्ला होता. संसद भवनाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवानांना आम्ही अभिवादन करतो. बांगलादेश मुक्तीच्या आंदोलनाला इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली या सभागृहाचाही पाठिंबा होता, असेही पीएम मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

आजपर्यंत कितीवेळा विशेष अधिवेशन

१९४७ – ब्रिटीशांकडून सत्ता हस्तांतरावेळी संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन

१९६२ – भारत चीन युद्धावेळी संसदेच्या विशेष अधिवेशन

१९७२ – २५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष अधिवेशन

१९७७ – तमिळनाडू राष्ट्रपती राजवटीवेळी देखील विशेष अधिवेशनाचे आयोजन

१९९१ – हरियाणा राष्ट्रपती राजवटीवेळी

१९९७ – ५० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त

२०१२ – संसदेच्या ६० वर्षानिमित्त देखील संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.

२०१५ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त

२०१७ – GST बिल मंजूर करण्यासाठी विशेष अधिवेशन

हेही वाचा:

 

Back to top button