India Or Bharat : काय काय बदलणार?, सर्वांमध्ये ‘I’ चा अर्थ ‘इंडिया’; वडेट्टीवारांचा भाजपवर पलटवार | पुढारी

India Or Bharat : काय काय बदलणार?, सर्वांमध्ये 'I' चा अर्थ 'इंडिया'; वडेट्टीवारांचा भाजपवर पलटवार

पुढारी ऑनलाईन डेस्क :राष्ट्रपतींच्या अधिकृत राजपत्रावर इतिहासात पहिल्यांदाच “प्रेसिडेंट ऑफ इंडिया” ऐवजी “प्रेसिडेंट ऑफ भारत” असा उल्लेख करण्यात आला आहे. ISRO, IIT, IIM, IPS… सर्वांमध्ये ‘I’ चा अर्थ हा इंडिया आहे.” असं म्हणतं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला पलटवार केला आहे. (India Or Bharat )

सध्या इंडिया हे नाव खूप चर्चेत आहे. भारतीय राज्यघटनेतून ‘इंडिया’ हा शब्द हटवण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया विविध क्षेत्रातून व्‍यक्‍त हाेत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही ट्विटमध्ये असे काही संकेत दिले आहेत. नुकतेच सत्ताधारी भाजपच्‍या काही नेत्यांनीही ‘इंडिया’ हे नाव गुलामगिरीचे प्रतीक असल्याचे सांगून ते काढून टाकण्याचे आवाहन केले होते.

India Or Bharat : भीतीपोटी हे सगळं सुरू आहे

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ‘एक्स’ खात्यावर पोस्ट करत भाजपावर निशाणा साधला आहे. त्‍यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींनी घेतला INDIA चा धसका, राष्ट्रपतींच्या अधिकृत राजपत्रावर इतिहासात पहिल्यांदाच “प्रेसिडेंट ऑफ इंडिया” ऐवजी “प्रेसिडेंट ऑफ भारत” असा उल्लेख करण्यात आला आहे. ISRO, IIT, IIM, IPS… सर्वांमध्ये ‘I’ चा अर्थ हा इंडिया आहे.

डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया मध्ये सुद्धा इंडिया आहे ! देशाच्या क्रिकेट संघाचे नाव सुद्धा इंडियन क्रिकेट टीम आहे. काय काय बदलणार ? मोदींना पराभव आता स्पष्ट दिसू लागला आहे. या भीतीपोटी हे सगळं सुरू आहे. इंडिया असो की भारत नाव बदलून देशातील महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार हे प्रश्न संपणार आहेत का?, असा सवाल करत केंद्र सरकारचा कारभार म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे.

जयराम रमेश यांच्या दाव्याने खळबळ

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी जी २० परिषदेच्या डिनरसाठी पाठवलेले आमंत्रण ‘भारताच्या राष्ट्रपती’ ऐवजी ‘राष्ट्रपती’च्या नावाने पाठवण्यात आले आहे. त्यांनी येथे भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 चा उल्लेख केला आहे. ज्यामध्ये देशाच्या नावाचे वर्णन केले आहे. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले आहे की, ‘भारतीय प्रजासत्ताक – आनंद आणि अभिमान आहे की आमची सभ्यता अमरत्वाकडे मोठ्या धैर्याने पुढे जात आहे.’

हेही वाचा 

Back to top button