Mohan Bhagwat : ‘देशात वाईटापेक्षा चांगल्या कामांची चर्चा अधिक’ | पुढारी

Mohan Bhagwat : 'देशात वाईटापेक्षा चांगल्या कामांची चर्चा अधिक'

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : सध्या देशात ज्या चांगल्या गोष्टी घडत आहेत त्याची वाईट गोष्टींपेक्षा किमान 40 पट जास्त चर्चा होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. उत्तर मुंबईतील कांदिवली येथे श्रीमती धनकुवरबेन बाबूभाई ढाकण हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थिती होते.

मोहन भागवत पुढे म्हणाले, “अनेक वेळा नकारात्मक चर्चा ऐकायला मिळतात. पण जेव्हा मी देशभर फिरतो आणि पाहतो तेव्हा आढळते की भारतात घडत असलेल्या वाईट गोष्टींपेक्षा 40 पट जास्त चांगल्या गोष्टी विषयी बोलले जात आहे. सरकारची धोरणे आणि सरकारमधील जबाबदार व्यक्तींच्या कामामुळे आज देश प्रगतीपथावर आहे. पण काही ही प्रगती खुपते आहे. भारताला वैभव प्राप्त करून देण्याची लोकांची इच्छा 40 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज अधिक प्रबळ झाली आहे. त्यात उत्तरोत्तर वाढ झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

मंदिरांचे एकत्रीकरण समाजाला जोडेल, देश समृद्ध करेल

डॉ. भागवत यांनी शनिवारी सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या जगभरातील मंदिर प्रमुखांचे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशन आणि एक्स्पोचे उद्घाटन केले. महासंमेलनात जमलेल्या देश-विदेशातील मंदिर प्रमुख आणि इतर प्रतिनिधींना संबोधित करताना ते म्हणाले की, मंदिरे हा आपल्या सनातनी परंपरेचा अविभाज्य भाग आहे. संपूर्ण समाज एका ध्येयाने चालवण्यासाठी मठ-मंदिरांची गरज आहे. मंदिर हे आपल्या प्रगतीचे सामाजिक साधन आहे. मंदिरात शिक्षण मिळावे, संस्कृती लाभावी, सेवा व्हावी आणि सर्वांना प्रेरणा मिळावी. समाजाची काळजी असणारे मंदिर असावे. सर्व मंदिरांच्या एकत्रीकरणाने समाज जोडला जाईल, त्याची उन्नती होईल, राष्ट्र समृद्ध होईल.’ काशी विश्वनाथ मंदिराच्या बदललेल्या स्वरूपाचेही भागवत यांनी कौतुक केले.

‘लहानातल्या लहान मंदिरातही पूजा व्हावी आणि तिथे स्वच्छतेची व्यवस्था असावी. अनेक ठिकाणी मंदिरे सरकारच्या ताब्यात आहेत, ती कशी जोडायची याचाही विचार व्हायला हवा. मंदिरे जोडली जात आहेत, आता पुढील कार्यक्रम सर्व मंदिरांचे सर्वेक्षण करण्याचा आहे. मंदिर सेवेचा वारसा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायला हवा, त्यासाठी शिक्षण आणि जागृती महत्त्वाची आहे. हे लक्षात घेता, आपण मंदिर व्यवस्थापनातील प्रत्येक पैलू मजबूत करणे आवश्यक आहे, मग ती स्वच्छता असो, सेवा असो किंवा पायाभूत सुविधा असो, असेही डॉ. भागवत म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना संघ सरसंघचालक म्हणाले की, मंदिरांवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. मंदिरे ही पवित्रतेचे प्रतिक असल्याने स्वच्छता ही मंदिर व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाचा मंदिरांवरही मोठा प्रभाव पडला आहे, तथापि आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेद्वारे आम्हाला जगातील प्रत्येक लहान-मोठ्या मंदिरात हे अधिक खोलवर पोहोचवायचे आहे.’

Back to top button