नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशभरातील 22 राज्यांमधील 235 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून, या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे विविध दुर्घटनांमध्ये 19 जुलैपर्यंत देशभरात 747 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 हजार घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुरामुळे 2.50 लाख हेक्टर पीक नष्ट झाले आहे. मृत जनावरांची संख्या 21 हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात पूरसद़ृश परिस्थिती असलेल्या ठिकाणांवर एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील 6 जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफ सज्ज आहे.
पंजाबमधील पूरस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. पठाणकोटला हिमाचल प्रदेशशी जोडणारा चक्की पूल बंद करण्यात आला आहे. कर्तारपूर कॉरिडॉरही पुढील 3 दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. हरियाणा-पंजाब सीमेवर सरदुलगडअंतर्गत येणार्या भुंदड गाव घग्गर नदीच्या पाण्यामुळे संकटात आहे. सरदुलगडअंतर्गत फौजा मंडी गावही चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. लष्कर आणि एनडीआरएफकडून लोकांना येथून बाहेर काढले जात आहे.