पाकिस्तानच्या सीमा हैदरनंतर बांगला देशच्या ज्युलीची करामत; भारतीय पतीचे केले अपहरण | पुढारी

पाकिस्तानच्या सीमा हैदरनंतर बांगला देशच्या ज्युलीची करामत; भारतीय पतीचे केले अपहरण

मुरादाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानातून भारतात बेकायदा दाखल झालेल्या सीमा हैदरनंतर आता आणखी एक प्रकरण (एका अर्थाने असेच, पण जरा हटके) समोर आले आहे. बांगला देशातील ज्युली हिची यूपीतील मुरादाबादेतील अजय याच्याशी फेसबुकवर मैत्री झाली. ज्युली तिची मुलगी हलिमा हिच्यासह भारतात दाखल झाली. ज्युलीने हिंदू धर्म स्वीकारला आणि अजयशी लग्न केले. आता अजयच गायब आहे.

अजयची आई सुनीताही अजयला वाचवावे म्हणून पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवत आहे. सुनीता यांनी पोलिस अधीक्षकांना एक निवेदनही दिले आहे. तीन महिन्यांपूर्वी ज्युली ही तिची मुलगी हलिमा (वय 11) हिच्यासह मुरादाबादेत आली होती. ज्युलीने इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला आणि अजयशी लग्न केले. नंतर व्हिसाची मुदत वाढविण्याच्या नावाखाली ती कोलकात्याला गेली. अजयलाही सोबत नेले. नंतर अजयचा फोन आला, की तो ज्युलीसोबत बांगला देशला निघून गेला आहे. ज्युलीने ओळख काढून त्याला सीमापार नेलेले आहे. पंधरा-वीस दिवसांनी तो परतेल. नंतर अजयचा पैशांसाठी म्हणून फोन आला. आता व्हॉटस्अ‍ॅपवर अजयचे रक्तबंबाळ अवस्थेतील फोटो मला पाठवले जात आहेत. अजयला बांगला देशातून सुखरूप आणावे म्हणून सरकारने हालचाल करावी, अशी विनंती सुनीता यांनी या निवेदनातून केली आहे.

Back to top button