पुढारी ऑनलाईन डेस्क : "त्यांचे प्रथम लक्ष्य हे आपल्या कुटुंबाच्याविकासावर आहे. त्यांच्यासाठी राष्ट्र काहीच नाही. केवळ वैयक्तिक हितांना प्राधान्य दिले जात आहे. या राजकीय पक्षांचे ब्रीदवाक्य 'कुटुंबाचे, कुटुंबासाठी' असे आहे."अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( दि. १८) विरोधी पक्षांवर बंगळूर येथील सभेपूर्वी घणाघाती हल्ला केला. पोर्ट ब्लेअर येथील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या राजकीय पक्षांची धडपड ही घराणेशाहीच्या राजकारणाला चालना देण्यासाठी सुरु आहे. या राजकीय पक्षांचे ब्रीदवाक्य "कुटुंबाचे, कुटुंबासाठी" आहे. आज देशातील जनतेने आम्हाला २०२४ मध्ये परत आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताच्या दुर्दशेला जबाबदार असलेल्या लोकांनी आपली दुकाने उघडली आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
बंगळूरमधील बैठकीला देशातील लोक म्हणतात की हे 'कट्टार भारताचार संमेलन' आहे. या बैठकीची आणखी एक खासियत म्हणजे कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारात कोणी जामिनावर बाहेर पडले तर त्यांच्याकडे मोठ्या आदराने पाहिले जाते. लोकशाही ही लोकांचे, लोकांद्वारे आणि लोकांसाठी असते; परंतु घराणेशाही राजकीय पक्षांसाठी ते कुटुंबाचे, कुटुंबाने आणि कुटुंबासाठी असते. कुटुंब प्रथम, राष्ट्र काहीही नाही. हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. द्वेष, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाचे राजकारण आहे. घराणेशाहीच्या राजकारणाच्या आगीत देश भस्मसात झाला आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.