उत्तर भारतात पावसाने हाहाकार, पूर-भूस्खलनामुळे ५६ मृत्युमुखी
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर भारतातील सात राज्यांमध्ये दोन दिवसांपासून सुरु असणार्या मुसळधार पावासाने ( Heavy rain ) हाहाकार माजवला आहे. या राज्यांमध्ये पूर-भूस्खलनामुळे ५६ मृत्यू झाला आहे. नागरिकांनी पुढील 24 तास घराबाहेर पडू नये, असे आवाहन हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दिल्ली, पंजाब आणि हिमाचलसह देशातील उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत सात राज्यांमध्ये भूस्खलन आणि पुराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला आहे.
मनालीमध्ये 52 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला गेला आहे. हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना पुढील 24 तास घरात राहण्यास सांगितले आहे. राज्यातील अनेक नद्या आणि कालवे धोक्याच्या चिन्हावर आहेत. दोन ठिकाणी ढग फुटले आहेत. कुल्लूमधील बियासबरोबरच पार्वती आणि तीर्थन नद्यांनाही उधाण आले आहे. राज्यातील विविध भागात पाण्याच्या जोरदार प्रवाहात 60 वाहने वाहून गेली. त्याचवेळी कुल्लूच्या कसालमध्ये 6 वाहने पाण्यात वाहून गेली.
पंजाबमध्ये सतलज नदीजवळील १५ ते २० गावे रिकामी करण्यात आली आहेत. त्याचवेळी लेह-लडाखमध्ये मुसळधार पावसामुळे ४५० वर्षे जुने घर कोसळले. हिमाचलमध्ये ४६ घरे उद्ध्वस्त झाली आहेत.
देशातील एकूण पाऊस आता सामान्यपेक्षा जास्त झाला आहे. 9 जुलैपर्यंत सरासरी 239 मिमी पाऊस झाला होता. आता हा आकडा 243 मिमी पर्यंत ओलांडला आहे, जो 2% अधिक आहे.दिल्लीतील पावसाचा 41 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. गुरुग्राममध्ये रस्ते नद्या बनले. यमुनेच्या वाढत्या पाण्याच्या पातळीबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ते धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचले आहे.
Heavy rain : उ. भारतात पावसाचा कहर…
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित राज्याच्या वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी बोलून, भारताच्या काही भागात उद्भवलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेतला आहे, अशी माहिती पीएमओने दिली आहे.
- दिल्लीतील यमुना नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हाजवळ पोहोचली आहे.
- राजधानी दिल्लीत यमुना नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. दरम्यान दुपारी 1 वाजता नदीच्या पाण्याची पातळी 204.63 मीटर नोंदवली गेली आहे.
- दिल्लीत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही, परंतु सरकारने तयारी केली आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
- अमरनाथ यात्रा जम्मूमार्गे सलग तिसऱ्या दिवशी थांबवण्यात आली.
- पंजाबमधील लुधियानामध्ये मुसळधार पावसामुळे आज ( दि. १० ) शाळा बंद ठेवण्यात आल्या.
- NDRF ने मध्य प्रदेशातील नर्मदा नदीत अडकलेल्या चार जणांची सुटका केली.
- दिल्लीतील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी बैठक घेतली.
- हरियाणामध्ये NDRF बोलावले, मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या बैठकीत निर्णय.
- पंजाबमध्ये सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शाळा १३ जुलैपर्यंत बंद.
- दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायालयाच्या खोलीत पाणी शिरल्याने त्यांना हलवण्यात आले.
- हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. दरम्यान उद्यापासून याठिकाणी पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
- उत्तराखंडमध्ये पुढील 3 दिवस अशाच प्रकारचा कमी तीव्रतेचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, असेही IMD ने म्हटले आहे.
- आज पूर्व पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दक्षिण राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस अपेक्षित आहे, असे IMD दिल्लीच्या शास्त्रज्ञ सोमा सेन यांनी म्हटले आहे.

