पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील कूचबिहार जिल्ह्यातील साहेबगंज पंचायत कार्यालयाबाहेर केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर आज ( दि.१७) हल्ला झाला. राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीच हा हल्ला केल्याचा दावा भाजपने केला आहे.
आपल्यावर शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. रार्जंयातील आगामी पंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज छाननीसाठी पंचायत कार्यालयात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. त्यांची कागदपत्रे हिसकावण्यात आली. पोलिसांसमोर त्यांना मारहाण करण्यात आल्याचे प्रामाणिक यांनी सांगितले. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आपल्यावर हल्ला केला. स्थानिक पोलिसांचे त्यांना पाठबळ मिळाले, टीएमसीच्या गुंडांनी बीडीओ कार्यालयात भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा विनयभंग केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्यात अनेक उमेदवार गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपकडून हल्ल्याचा निषेध
भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रामाणिक यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे. केंद्रीय राजमंत्र्यांसोबत वर्तन असेल तर सामान्य लोकांसोबत किती वाईट असेल याची कल्पना करा, होईल याची कल्पना करा, असे भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी 'एएनआय'ला सांगितले. प्रामाणिक यांच्या कारवर बॉम्ब फेकण्यात आला. यावेळी टीएमसी मंत्री उदयन गुहा त्यांच्या गुंडांसह दीड हजारांहून अधिक लोक तेथे उभे होते, असाही दावा मजुमदार यांनी केला,.
पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून विविध भागांमध्ये हिंसाचाराचा घटना घडल्या आहेत. दासपूर (पश्चिम मेदिनीपूर), काकद्वीप (दक्षिण 24 परगणा), राणीनगर (मुर्शिदाबाद), शक्तीनगर आणि बारशूल (दोन्ही पूर्व वर्धमान) आणि मिनाखान (उत्तर 24 परगणा) येथे दोन गटांमध्ये धुश्मचक्री झाल्या आहेत.