Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील १५१ मृतांची ओळख पटली | पुढारी

Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातातील १५१ मृतांची ओळख पटली

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रेल्वेच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात भीषण अपघात शुक्रवारी सायंकाळी ओडिशाच्या बालासोरनजीकच्या बहानग बजार येथे घडला. स्थानकावर थांबलेली मालगाडी, बंगळूर-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि शालीमार चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस या तीन गाड्यांचा हा अपघात घडल्याची ही घटना दुर्मीळ समजली जात आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या 151 मृतदेहांची आतापर्यंत ओळख पटली आहे. हे सर्व मृतदेह त्यांच्या मूळगावी पाठवले जात आहेत. ओडिशा सरकारने मृतदेह वाहून नेण्याची मोफत व्यवस्था केली असल्याचे ओडिशाचे मुख्य सचिवांनी सांगितले.

शुक्रवारची सायंकाळ ओडिशातून प्रवास करणार्‍या रेल्वे प्रवाशांसाठी जणू काळ बनून आली. बालासोर येथील बहानग बजार रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी सातच्या सुमारास तीन रेल्वेगाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या महाभीषण दुर्घटनेत 300 प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे गाड्यांच्या आघाताची तीव्रता एवढी होती की, कित्येक प्रवाशांचे मृतदेह डब्यांच्या खिडक्या फोडून बाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत एक हजारहून अधिक प्रवासी जखमी झाले. ही या शतकातील सर्वात भीषण रेल्वे दुर्घटना आहे. बालासोर, कटक आणि आसपासच्या शहरांतील रुग्णालयांत जखमींवर उपचार सुरू आहेत.

 

हेही वाचा : 

Back to top button