Heat : उत्तर भारतात उष्णतेची काहिली, पारा ४५ अंशावर
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढू लागला असून, अनेक ठिकाणी पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. दिल्लीकर नागरिकांची कडक उन्हामुळे दैना उडाली आहे.
बाहेर काम करणारे मजूर, बेघर लोकांबरोबरच प्राण्यांना उष्णतेचा सर्वाधिक त्रास होत आहे. पुढील काही दिवस पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असला तरी जोवर पाऊस पडत नाही, तोवर नागरिकांना एसी, कुलरचा आधार घेण्याशिवाय पर्याय नाही.
दिल्लीतील सफदरजंग हवामान केंद्रात आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान ४३.७ अंश इतके नोंदविण्यात आले आहे, तथापि नजफगड, नरेला, पितमपुरा, पुसा आदी भागात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्याही पुढे गेलेले आहे. अशीच परिस्थिती दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गाझियाबाद, फरिदाबाद, गुरुग्राम या शहरांची आहे.