केजरीवाल घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, केंद्राच्‍या ‘त्‍या’ अध्यादेशाविरोधात समर्थनाची करणार मागणी | पुढारी

केजरीवाल घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, केंद्राच्‍या 'त्‍या' अध्यादेशाविरोधात समर्थनाची करणार मागणी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल या संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिल्ली सरकारच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र शुक्रवार, १९ मे रोजी केंद्र सरकारने काढलेल्‍या नव्या अध्यादेशाद्वारे ‘राष्ट्रीय राजधानी नागरी सेवा प्राधिकरण’ची स्थापना झाली आहे. या विरोधात आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधी पक्षांचे समर्थन मागत आहे. केजरीवाल या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेणार असल्‍याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे

आम आदमी पार्टीच्‍या (आप) सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, केजरीवाल बुधवार २४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची तर २५ मे रोजी शरद पवार यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज ( दि.२१) केजरीवाल यांची दिल्‍लीत भेट घेतली. यावेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेही उपस्थित होते.

दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल या संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिल्ली सरकारच्या बाजूने निकाल दिला होता. हा निकाल लागताच केंद्राने या निर्णयाला बगल देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

” हा अध्‍यादेशा आणण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या सुट्टीची हेतुपुरस्सर वाट पाहत होते. त्यांना अध्यादेश आणायचा असेल तर ते आधीही आणू शकले असते. त्यांना माहित आहे की, हा अध्यादेश घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. आपण अध्यादेशाला न्यायालयात आव्हान दिले तर तो टिकणार नाही. १ जुलै रोजी न्यायालय सुटीनंतर पुन्‍हा सुरु झाल्‍यावर आम्‍ही याला आव्‍हान देणार आहोत, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button