आनंदवार्ता : मान्सून उद्या अंदमान, बंगालच्या उपसागरात दाखल होणार
पुणे, पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मान्सून अंदमानसह बंगालच्या उपसागरात दोन दिवस आधीच म्हणजे शनिवारी (दि. 20) दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षी मान्सून या भागात 22 मे रोजी आला होता. दरम्यान, देशाच्या काही भागांत वळवाचा पाऊस सुरू झाला असला, तरी महाराष्ट्रात मात्र आगामी पाच दिवस उष्णतेची लाट सक्रिय राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पाच दिवस उष्णतेची लाट
नागालँड, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, मध्य प्रदेशच्या काही भागांत वळवाचा पाऊस सुरू आहे, तर राजस्थानात धुळीचे वादळ सोमवारी (दि. 22) सक्रिय होत आहे. महाराष्ट्रात मात्र आगामी पाच दिवस उष्णतेची लाट सक्रिय होईल. कमाल तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ होईल.
कोकणला पुन्हा इशारा
आगामी पाच दिवस (19 ते 23 मे) राज्यातील बहुतांश भागांत उष्णतेची लाट सक्रिय होणार आहे. कोकणात कडक ऊन व आर्द्रताही जास्त असल्याने तेथे हिट डिस्कम्फर्ट (उष्णतेची अस्वस्थता) राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.