पुणे, पुढारी वृत्तसेवा: जगातील सर्वात उंच बेली ब्रिज म्हणून श्योकवरील बेली ब्रीजची नोंद पुढील वर्षात होणार आहे. सध्या १२ टनेलच्या कामाबरोबरच बागडोगरा आणि बराकपूर एअर फील्डवर काम सुरू असल्यानेच शत्रु राष्ट्रांच्या मनात धडकी भरत असल्याची माहिती बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे ले. जनरल राजीव चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. बॉर्डर रस्ते संघटनेच्या (बीआरओ) ६४ व्या वर्धापदिनानिमित्त 'मुख्य अभियंता आणि उपकरणे व्यवस्थापन परिषद' आयोजित करण्यात आली आहे. यात देशभरातील ६९ उद्योग सहभागी होत असून या परिषदेत हे उद्योग त्यांची उपकरणे प्रदर्शित करणार आहेत. कठीण भूप्रदेशामुळे कामे करताना येणाऱ्या आव्हानांना कमी करण्यासाठी अनेक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व सीमा मुख्य रस्त्यांसाठी जोडण्याचे काम बीआरओकडून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
ऑर्गनायझेशनने केलेल्या कामाविषयी माहिती देताना ते म्हणाले, ' व्हिजन ४७ ' मध्ये भारत जगातील सर्वात प्रगत व सीमा सुरक्षा करण्यात सक्षम देश म्हणून ओळखला जाणार आहे. पुढील २५ वर्षात भारत कसा असेल याची आखणी करून सर्व सीमा मुख्य रस्त्याना जोडलेल्या असतील. रस्त्यांबरोबर बीआरओ जगातील सर्वात उंच ब्रीज बांधत असून पुढील वर्षी या पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे. जगातील सर्वात उंच बेली ब्रिज म्हणून आमच्या कामाची नोंद जागतिक विक्रम म्हणून होणार आहे. याशिवाय बीआरओ सीमावर्ती भागापर्यंत सहजपणे जाता यावे, यासाठी १२ बोगदे बांधत असून शिंकूला बोगद्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.
बीआरओच्या माध्यमातून होत असलेल्या दळणवळणची उपलब्धता पाहता या कामाच्या बजेटची रक्कम २५०० वरून ५ हजार कोटी केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात खर्च ६ हजार वरून १३ हजार कोटी पर्यंत वाढला. तर, यंदा हेच बजेट १५ हजार कोटी पर्यंत वाढवला जाणार आहे. गेल्या दोन वर्षांत ५ हजार कोटी रुपयांचे २०५ प्रकल्प देशाला समर्पित केलेले आहेत, असेही चौधरी यांनी सांगितले.
उत्तर सीमेवर परिस्थिती गंभीर असल्याचे पाहूनच,आमच्या ऑर्गनायझेशनने सुरक्षा दलांसाठी अनेक धोरणात्मक प्रकल्प पूर्ण करून स्वाधीन केलेले आहेत. रस्ता तयार झाल्यानंतर वीज, दळणवळण, शाळा, रुग्णालये आणि इतर सुविधांच्या रूपात पोहोचलेला विकास सीमेलगतच्या शत्रु राष्ट्रांच्या मनात धडकी भरवत आहे. बीआरओच्या 'उपकरणे व्यवस्थापन परिषद' यामध्ये रविवारी (दि.) रक्षा राज्यमंत्री अजय भट्ट यांच्या उपस्थितीत नवीन तंत्रज्ञानानाचे सादरीकरण केले जाणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.