Sharad Pawar News : काकांच्या पत्रकार परिषदेत अजित पवार गैरहजर! दिल्लीला गेल्याची चर्चा | पुढारी

Sharad Pawar News : काकांच्या पत्रकार परिषदेत अजित पवार गैरहजर! दिल्लीला गेल्याची चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद (Press Conference) घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं. कार्यकर्ते आणि पक्षातील नेत्यांच्या भावनांचा मान राखत मी हा निर्णय घेतल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केले.

पण या पत्रकार परिषदेदरम्यान, पक्षाचे नेते आणि शरद पवार यांचे पुतणे अजित पवार उपस्थित नव्हते. त्यामुळे दादांच्या गैरहजेरीची रंगली आहे. काही जणांनी तर अजित पवार हे दिल्लीला गेल्याचे म्हटले. यावरून शरद पवारांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी ही माहिती चुकीची असून ते नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले.

कुठंतरी थांबलं पाहिजे, असं म्हणत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी हे धक्कातंत्र होतं. अशातच दोन दिवसाच्या नाट्यमय घडामोडीनंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे घेतल्याचे जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २ मे रोजी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यातील राजकारणात विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. पवार यांनी निर्णय घेतला त्यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु गेल्या तीन दिवसांपासून वाय.बी.चव्हाण सेंटरच्या बाहेर कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरुच होते. त्यावेळी गुरुवारी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना सजवण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी अजित पवार नव्हते आणि शुक्रवारी पत्रकार परिषदेदरम्यानही ते गैरहजर होते.

शरद पवार काय म्हणाले?

दिनांक २ मे २०२३ रोजी लोक माझे सांगाती’ ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती..

परंतु, मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.

‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे’ या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसापर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.

आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानाशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो. धन्यवाद !

Back to top button