पुढारी ऑनलाईन डेस्क : रामनवमी हिंसाचार प्रकरणावरून बिहारच्या विधानसभेत आज (दि. ५) प्रचंड गदारोळ झाला. सभागृहात गोंधळ घातल्याबद्दल भाजप आमदार जीवेश मिश्रा यांना अध्यक्षांच्या आदेशावरून हात आणि पायाला धरून मार्शलने सभागृहाबाहेर काढले. यानंतर पुन्हा गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर आमदार जीवेश मिश्रा यांनी रामनवमीच्या दिवशी सासाराम आणि नालंदा येथे झालेला हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. हिंसाचार संदर्भात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सभागृहात उत्तर देण्याच्या मागणीवरून मिश्रा यांनी जोरदार गोंधळ घातला. अखेर सभापतींच्या आदेशावरून मार्शलने मिश्रा यांना सभागृहाबाहेर काढले. या कारवाईचा निषेध करताना जीवेश मिश्रा म्हणाले की, बिहारमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचार आणि हिंदूंच्या हत्येबाबत सभागृहात आवाज उठवला होता. याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांना सभागृहात येऊन उत्तर देण्यास सांगितले होते. मात्र एकतर्फी कारवाई करून सभागृहाबाहेर काढण्याचे काम अध्यक्षांनी केले आहे. हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात सभागृहात आवाज उठवल्याबद्दल झालेली कारवाई बिहारमधील जनता पाहत आहे. या घटनेने आज लोकशाहीची लाज वाटली, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. त्यांना बाहेर काढल्यानंतर सभागृहात पुन्हा गदारोळ झाल्याने अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.
हेही वाचा :