Rahul Gandhi defamation case | राहुल गांधींचा जामीन १३ एप्रिलपर्यंत वाढवला, आव्हान याचिकेवर सुरत कोर्टात ३ मे रोजी सुनावणी | पुढारी

Rahul Gandhi defamation case | राहुल गांधींचा जामीन १३ एप्रिलपर्यंत वाढवला, आव्हान याचिकेवर सुरत कोर्टात ३ मे रोजी सुनावणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जामीन सुरत सत्र न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत वाढवला आहे. राहुल गांधी यांनी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला आव्हान दिले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी ३ मे रोजी सुरत न्यायालयात होणार आहे. मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांच्या तुरुंगवासाच्या सुनावलेल्या शिक्षेविरुद्ध राहुल गांधी यांनी अपील दाखल केले आहे. त्यासाठी ते आज बहीण प्रियांका गांधी वधेरा यांच्यासह सुरतला दाखल झाले होते. (Rahul Gandhi defamation case)

‘मोदी’ आडनावावरून अवमानकारक टिप्पणी केल्याच्या मानहानी प्रकरणात सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने याबाबतचा आदेश जारी केला होता. स्वतः राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासाठी हा जबर धक्का होता. पण मानहानी प्रकरणी त्यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेला त्यांनी सूरत जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. दरम्यान, न्यायालयाने याआधीच राहुल गांधी यांना त्यांच्या आदेशावर अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली होती.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांच्यासह राजस्थान, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते आज राहुल गांधी यांच्या सोबत सूरतमध्ये पोहोचले.

वायनाड येथील माजी खासदार राहुल गांधी यांना मुख्य न्यायदंडाधिकारी एच एच वर्मा यांच्या न्यायालयाने २०२९ मधील त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीबद्दल मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

काय आहे प्रकरण?

कर्नाटकमधील कोलार येथे १३ एप्रिल २०१९ रोजी निवडणूक प्रचार सभेत बोलताना गांधी यांनी ‘मोदी’ आडनावाच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. ”नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यामध्ये आडनाव समान आहे? सर्व चोरांचे आडनाव मोदी असते का?’ असे ते वक्तव्य होते. गांधी यांच्या या वक्तव्याला आक्षेप घेत भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्याविरोधात अवमानना खटला दाखल केला होता. गांधी यांनी आपल्या वक्तव्याद्वारे संपूर्ण मोदी समाज चोर असल्याचे सांगत या समाजाचा अपमान केला असल्याचे पूर्णेश मोदी यांनी याचिकेत म्हटले होते.

घटनेतील कलम १०२ (१) (ई) तसेच लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ चे कलम ८ मधील तरतुदीनुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. लोकसभा महासचिव उत्पलकुमार सिंग यांनी गांधी यांची खासदारकी रद्द होत असल्याचे निर्देशात म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button