

5 soldiers swept away in flash floods arunachal pradesh 4 people killed after being buried landslide
पुढारी ऑनलाईन : अरुणाचल प्रदेशात शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यातील दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे लष्कराचे दोन शेल्टर वाहून गेले. या दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराचे ५ जवान बेपत्ता झाले आहेत. तर सुबनसिरी जिल्ह्यात रस्त्याच्या ठिकाणी झालेल्या भीषण भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी घडल्याचे सांगण्यात येत आहे.
भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू
सुबनसिरी जिल्ह्यातील केओजारिंग-ब्याचिंग रस्ता कटिंगच्या ठिकाणी मोठे भूस्खलन झाले. यामध्ये अनेक कामगार आणि नागरिक ढिगाऱ्याखाली दबले गेले. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
मृतांमध्ये तादू बाकी, ताजी राय, मार्कोश बसुमतारी आणि बाबुल अली यांचा समावेश आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बाबुल अली यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आला आहे.
लष्करी छावणीत अचानक पूर
दिबांग व्हॅली जिल्ह्यातील पसू पानी लष्करी छावणीत मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे ५व्या ग्रेनेडियर्सचे दोन शेल्टर वाहून गेले. पुराच्या वेगवान प्रवाहात एकूण ७ जवान वाहून गेले होते. त्यापैकी २ जवानांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले असून, ५ जवान अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांमध्ये हवालदार उपेंदर, कुंदन, विनोद, आदित्य आणि समुंदा यांचा समावेश आहे.
जवानांचा शोध सुरू
बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी ५व्या ग्रेनेडियर्सच्या पथकांना तैनात करण्यात आले आहे. तसेच ITBPच्या ५८व्या बटालियनचे जवान, सीमा रस्ते संघटनेचे ६२ RCC (GREF), स्थानिक स्वयंसेवक आणि अरुणाचल प्रदेश पोलिसांची संयुक्त पथके घटनास्थळी शोधमोहीम राबवत आहेत.