![BS Yediyurappa’s Home Attacked : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयासह घरावर दगडफेक](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F03%2Fbs-yediyurappa-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे बंजारा आणि भोवी समाजातील लोकांनी निषेध-आंदोलन केले. यादरम्यान माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयावर आणि घरावर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. माजी न्यायमूर्ती सदाशिव आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीला ते विरोध करत होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर येत आहे. (BS Yediyurappa's Home Attacked)
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पा यांच्या शिवमोग्गा मधील शिकारीपूर येथील घरावर हल्ला करण्यात आला. आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोध करणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरावर दगडफेक केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. कर्नाटकात या वर्षीच विधानसभा निवडणुका होणार आहेत.
अंतर्गत आरक्षणाबाबत आक्षेप
बंजारा समाजाने अनुसूचित जाती-जमाती समाजाला दिलेल्या अंतर्गत आरक्षणाबाबत आक्षेप नोंदवला आहे. शुक्रवारी कर्नाटकच्या भाजप सरकारने अनुसूचित जाती-जमाती समाजासाठी अंतर्गत आरक्षण जाहीर केले होते. त्यानुसार, अनुसूचित जाती जमातीसाठी उपलब्ध असलेले 17 टक्के आरक्षण आता अंतर्गत वाटप केले जाईल. या निर्णया विरोधात हे आंदोलन करण्यात आले. (BS Yediyurappa's Home Attacked)
बंजारा समाजाचे नुकसान
सदाशिव आयोगाच्या शिफारशीच्या आधारे राज्य सरकारने हे केले. सदाशिव आयोगाच्या शिफारशीमुळे त्यांच्या समाजाचे नुकसान होणार असल्याचे बंजारा समाजाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.
येडियुरप्पा म्हणाले
त्यांच्या घरावर आणि कार्यालयावर झालेल्या दगडफेकीवर भाजप नेते बीएस येडियुरप्पा म्हणाले की, ते बंजारा समाजाच्या नेत्यांना बोलावून त्यांच्याशी बोलणार आहेत. गेल्या ५० वर्षांपासून मी शिकारीपुराच्या विकासासाठी काम करत आहे, आंदोलकांचा काही गैरसमज असू शकतो, त्यामुळे मी एसपी आणि डीसी यांना कोणतीही कठोर कारवाई करू नये असे सांगितले आहे.
शिवमोग्गा येथे प्रतिबंधात्मक आदेश लागू
बंजारा समाजाच्या काही लोकांनी केलेल्या निदर्शनात काही पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर, शहरात कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हिंसाचारामागे काँग्रेसला जबाबदार धरले. ते म्हणाले की, काँग्रेसचे स्थानिक नेते लोकांना भडकावत आहेत. प्रत्येक समाजाला दिलेला सामाजिक न्याय काँग्रेसला पचवता आला नाही आणि त्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला आहे. बंजारा समाजाने अफवांच्या प्रभावाखाली येऊ नये.
अधिक वाचा :