‘सत्ता संघर्षा’वरील सुनावणीवेळी हरीश सावळेंचा युक्‍तीवाद, ” जे राज्यपाल करु शकले नाहीत …” | पुढारी

'सत्ता संघर्षा'वरील सुनावणीवेळी हरीश सावळेंचा युक्‍तीवाद, " जे राज्यपाल करु शकले नाहीत ..."

नवी दिल्ली-पुढारी वृत्तसेवा : राज्यपालांना बहुमताची गणिती आकडेमोड करण्यासाठी पदावर बसविले जात नाही. ते बहुमत चाचणीसाठी सत्ताधाऱ्यांना पाचारण करु शकतात. ते स्वतः आमदार सदस्यांची डोकी मोजू शकत नाहीत; पण ठाकरे गटाचे वकील न्यायालयालाच आमदारांची आकडेमोड करायला सांगत आहेत, असा टोला मारत राज्यपाल जे करु शकले नाहीत, ते न्यायव्यवस्थेला करायला सांगितले जात आहे आणि यापेक्षा धोकादायक काहीही असू शकत नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी आज (दि. २) सत्ता संघर्षाच्या सुनावणीदरम्यान शिंदे गटाकडून केला. दरम्यान, सत्ता संघर्षाची सुनावणी 14 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

बहुमत चाचणीवेळी ठाकरे गटाचे आमदार कोठे होते?

एकनाथ शिंदे यांच्या बहुमत चाचणीवेळी ठाकरे गटाचे आमदार कोठे होते, असा सवालही साळवे यांनी उपस्थित केला. उध्दव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला सामोरे न जाता त्याआधी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिंदे – फडणवीस यांना बहुमत चाचणीच्या सूचना देण्यात आल्या, तेव्हा उध्दव ठाकरे सोडाच; पण ठाकरे यांचे १३ खंदे आमदारही मतदानाला अनुपस्थित होते. घटनापीठाने हा मुद्दा लक्षात घ्यावयास हवा, असे साळवे यांनी नमूद केले.

राजकारणात अंदाज लावून सारे ठरवू शकत नाही

शिंदे गटाने वेगळी भूमिका घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यावर सरकार कोसळले. यानंतरच राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले. राजकारणात वेगाने वाहणारे पाणी क्षणाक्षणाला वेगवेगळी वळणे घेत असते. आपण प्रत्येकवेळी अंदाज लावून सारे ठरवू शकत नाही आणि इथेच हा मुद्दा संपतो, असा युक्तिवादही साळवे यांनी केला.

ठाकरे गटाकडून मांडण्यात आलेले मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न हरीश साळवे यांनी केला. उद्धव ठाकरे निवडून आलेले सदस्य असते तर न्यायालयाला नियमाच्या अधिन राहून यात लक्ष घालता आले असते, असे सांगतानाच राज्यपालांनी दिलेले बहुमत चाचणीचे निर्देश नियमाला आणि परिस्थितीला धरुन होते, असे साळवे म्हणाले.

पुढील सुनावणी १४ मार्चला

सर्वोच्च न्यायालय आज दोन्ही बाजुंकडील युकि्तवाद ऐकून घेईल आणि निकाल राखून ठेवेल, असा अंदाज होता. तथापि हरीश साळवे यांनी युकि्तवाद करण्याचा निर्णय घेतल्याने कोर्टाचे वेळापत्रक बिघडले. होळीच्या सुटीमुळे सुनावणी लांबणीवर पडली असून आता पुढील सुनावणी 14 मार्च रोजी होईल. सलग दोन दिवस दोन्ही बाजूंचे तसेच राज्यपालांच्या वतीने म्हणणे मांडले जाणार आहे.

आजच्‍या सुनावणीतील ठळक वैशिष्ट्ये

* हरीश साळवे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणीत सहभागी झाले. पुढील सुनावणीवेळी साळवे आपला राहिलेला युक्तिवाद पूर्ण करतील. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी हेही अजून बाजू मांडणार आहेत. ठाकरे गटाला रिजॉईन्डरसाठी पूर्ण वेळ दिला जाईल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.

* युक्तिवादाची सुरुवात शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी केली. जर सरकारला बहुमत गमवावे लागले आणि एक गट येऊन म्हणतो की आमच्याकडे बहुमत आहे, तर शिंदे गटाला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावून राज्यपालांनी कोणती चूक केली, असा सवाल कौल यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : 

 

Back to top button