15 वर्षे जुन्या 9 लाख सरकारी गाड्या 1 एप्रिलपासून होणार बाद | पुढारी

15 वर्षे जुन्या 9 लाख सरकारी गाड्या 1 एप्रिलपासून होणार बाद

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  केंद्र तसेच राज्य सरकारांच्या अखत्यारीतील 15 वर्षे उलटून गेलेल्या सुमारे 9 लाख जुन्या गाड्या तसेच बसेस येत्या 1 एप्रिलपासून रस्त्यांवर धावणार नाहीत, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी फिक्की संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.

केंद्र व राज्य सरकारांच्या अखत्यारितील 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या रस्त्यावरून हद्दपार करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घेतला होता. त्यानुसार अशा सुमारे 9 लाख गाड्या 1 एप्रिलपासून हद्दपार होणार असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. सरकारांच्या अखत्यारितील गाड्यांबरोबरच राज्य परिवहन मंडळ आणि सार्वजनिक कंपन्यांच्या मालकीच्या पंधरा वर्षांपेक्षा जुन्या गाड्या हद्दपार होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

इथेनॉल, मिथेनॉल, जैव सीएनजी, जैव एलएनजी तसेच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सांगून गडकरी पुढे म्हणाले की, सरकारच्या अखत्यारितील गाड्या हद्दपार केल्यानंतर त्यांची जागा ज्या नव्या गाड्या घेतील, त्या पर्यायी इंधनावर धावणार्‍या असतील. सोलार ऊर्जा देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. अशा स्थितीत इलेक्ट्रिक वाहनांत सोलार ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ शकतो. लांब पल्ल्यावर धावणार्‍या ट्रक्ससाठी एलएनजी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Back to top button