विविधतेतही एकता हेच यशाचे सार : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आपल्या देशात अनेक पंथ आणि अनेक भाषा आहेत. तथापि, त्यामुळे आपण विभागलो गेलो नाही, तर अजून निकट आलो. त्यामुळेच आपण लोकशाही प्रजासत्ताक म्हणून यशस्वी झालो आहोत. माझ्या मते, हेच भारताच्या यशाचे सार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करत होत्या.
त्या म्हणाल्या, भारत विकासाच्या मार्गावर चालणारा देश बनला आहे. घटनाकारांच्या मार्गदर्शनाशिवाय ही प्रगती शक्यच नव्हती. गेल्यावर्षी भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला होता. सक्षम नेतृत्व आणि प्रभावी संघर्षाच्या बळावर देश लवकर मंदीतून बाहेर आला आणि विकासाच्या मार्गावर घोडदौड सुरू झाली. नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 21 व्या शतकातील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करणार आहे हे निःसंशय, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून घोषित करावे, अशी सूचना भारताने संयुक्त राष्ट्र संघाकडे केली होती आणि ती स्वीकारली गेली आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या आहारात भरड धान्याचा समावेश केल्यास पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल आणि लोकांचे आरोग्यही सुधारेल, असे राष्ट्रपतींनी आवर्जून सांगितले.