

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाच्या राजकारणात आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी कंबर कसली आहे. राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या वतीने खम्माम येथे बुधवारी आयोजित रॅलीला आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन, आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव सहभागी होणार आहेत. (BRS Meeting)
के. चंद्रशेखर राव गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय राजकारणावर ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या तेलंगाणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे करण्यात आले आहे.
के. चंद्रशेखर राव भाजप आणि काँग्रेस वगळून राष्ट्रीय पातळीवर आघाडीसाठी २०१९पासून प्रयत्नशील आहेत. यापूर्वी २०१४मध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाच्या रॅलींना इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते.
खम्माम येथील रॅलीला ५ लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा भारत राष्ट्र समितीने केला आहे. मे २०२१ला भारत राष्ट्र समितीच्या रॅलीला अडीच लाख लोकांची उपस्थिती होती.
काँग्रेस वगळून भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचा के. चंद्रशेख राव यांच्या प्रयत्नांना कितपत यश येते आणि अशी आघाडी झाली तर मतदार त्यांना किती स्वीकारतात हे येणारा काळच सांगू शकणार आहे.
हेही वाचा