अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट उघड | पुढारी

अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट उघड

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जगभरातील भाविकांसाठी अयोध्येतील राम मंदिर पूर्ण होण्याची 1 जानेवारी 2024 ही तारीख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केल्यानंतर दुसर्‍यांदा ते उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. मंदिर उडविण्यासाठी आमचा फिदाईन दस्ता (आत्मघातकी बॉम्बपथक) तयार आणि तत्पर आहे, अशी धमकी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिली आहे.

‘जैश’चे दहशतवादी नेपाळमार्गे भारतात येणार असून, आत्मघातकी बॉम्बने मंदिर उडवून देण्याचे कारस्थान त्यांनी रचलेले आहे, असा दुजोरा गुप्तचर यंत्रणांकडूनही
मिळाला आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे काम 65 टक्के पूर्ण झाले आहे. पुढील वर्षी या राम मंदिराचे लोकार्पण केले जाणार असल्याची घोषणाही भाजप नेते व गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ‘अल-कायदा’पाठोपाठ ‘जैश’च्या या धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून, केंद्रीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराची सुरक्षा यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. ‘जैश’चे दहशतवादी नेपाळमार्गे भारतात येणार असून, आत्मघातकी बॉम्बने मंदिर उडवून देण्याचे कारस्थान त्यांनी आखलेले आहे, असा दुजोरा गुप्तचर यंत्रणांकडूनही मिळाला आहे.

पंजाब आणि दिल्ली ही राज्ये दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. राजधानी दिल्लीसह पंजाबमध्येदेखील महत्त्वाच्या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संशयित व्यक्ती आणि वस्तूंवर पोलिसांची करडी नजर ठेवली जात आहे.

‘अल-कायदा’ या जिहादी समूहाच्या ‘गझवा-ए-हिंद’ या ऑनलाईन इस्लामिक नियतकालिकातून याआधी जाहीरपणे धमकी देण्यात आली आहे.

नियतकालिकाच्या ताज्या अंकात अयोध्येतील राम मंदिर उद्ध्वस्त करून त्याच ठिकाणी पूर्ववत मशीद बांधणार असल्याचे म्हटले आहे. हे संपादकीय पुढे म्हणते, जिहाद हा मुस्लिमांवर फर्ज आहे. इस्लामनुसार धर्मनिरपेक्षता हे मूल्य नरकासारखेच आहे. हिंदू-मुस्लिम बंधुत्व हे पोकळ आहे. बाबरी मशीद 30 वर्षांपूर्वी पाडण्यात आली. गुजरातेत अन्याय झाला. आजही सर्वत्र बुलडोझर चालवले जात आहेत. जामिया मिलिया (इस्लामिया) आणि अलीगडपासून जामिया उस्मानिया (हैदराबाद उपनगर) तसेच देवबंद शहरापर्यंत हिंदूंकडून मुस्लिमांना धोका आहे. ‘अल-कायदा’ त्याला जिहादने उत्तर देणार आहे. संपूर्ण भारतीय उपखंड इस्लामी जगाचा एक भाग बनेल आणि मूर्तिपूजा समूळ नष्ट होईल.

Back to top button