मोरबी पूल दुर्घटना : ‘तो’ रडला नसता तर सारे कुटुंब बुडाले असते | पुढारी

मोरबी पूल दुर्घटना : ‘तो’ रडला नसता तर सारे कुटुंब बुडाले असते

राजकोट : वृत्तसंस्था : मोरबी पूल दुर्घटनेत एका मुलाच्या रडण्यामुळे अवघ्या कुटुंबाचा जीव वाचला. नऊ वर्षांचा नेत्र रडला नसता तर अख्खे कुटुंब नदीत बुडाले असते.

अमरेली येथील सागर मेहता यांचे कुटुंबही दुर्घटनेपूर्वी काही मिनिटे आधी पुलावर होते; पण झुलता पूल गर्दीमुळे अधिकच झुलत असल्याने नेत्र घाबरला व धाय मोकलून ‘मला भीती वाटते, इथून चला’ असे रडू, ओरडू लागला. तो रडणे थांबवत नव्हता म्हणून सगळे कुटुंब पुलावरून खाली उतरले आणि पूल कोसळला… तत्पूर्वी, काढलेला सेल्फी माझ्यासाठी केवळ अविस्मरणीय आहे, असे सागर मेहता सांगतात.

Gujarat Morbi Bridge : पुलाचा इतिहास

मोरबीचे तत्कालीन राजे प्रजावत्सल सर वाघजी ठाकोर हे राजमहालातून दरबारापर्यंत या पुलाने जात असत. त्यांच्या काळातच पुलाची निर्मिती झाली. राजेशाही संपुष्टात आल्यानंतर मोरबी नगरपालिकेवर या पुलाची जबाबदारी सोपविण्यात आली. लाकूड आणि तारेने बनविण्यात आलेला हा पूल 233 मीटर लांब आणि 4.6 फूट रुंद आहे. हा पूल एक पर्यटनस्थळ होते. त्यासाठी 15 रुपये तिकिट दरही आकारला जात असे. 1880 मध्ये 3 लाख 50 हजार रुपये खर्चून हा पूल बनविण्यात आला होता. पुलासाठीचे साहित्य तेव्हा ब्रिटनमधून मागविण्यात आले होते.

एकाच कुटूंबातील १२ जणांचा मृत्यू

माहितीनुसार, गुजरातमधील मोरबी येथे मच्छू नदीवरील ‘केबल ब्रिज’ रविवारी सायंकाळी 6.30 वाजता अचानक तुटला. पूल तुटताच पुलावरील बहुतांश जण नदीत पडले. या दुर्घटनेत 140 हून अधीक जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये भाजपाचे खासदार मोहन कुंदारिया यांच्या कु़टूंबातील १२ जणांचा समावेश आहे. कुंदारिया यांच्या मुलीच्या सासरच्या माणसांचा समावेश आहे. दुर्घटना घडली तेव्हा पुलावर 500 पेक्षा जास्त लोक असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने मोरबीत एकच धावपळ उडाली. पोलिसांनी तसेच प्रशासनाने तत्काळ बचाव मोहीम सुरू केली. शक्य तितक्या लोकांना नदीतून बाहेर काढले. पुलाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली होती व तो पूर्ववत सुरू करण्यात आला होता. तत्पूर्वी, 6 महिने तो पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. गेल्या पाच दिवसांपासून तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता.

Back to top button