मुलींनी लग्नापूर्वीच घरकाम करणार नसल्याचे स्पष्ट करावे : मुंबई हायकोर्ट
पुढारी ऑनलाईन : एखाद्या मुलीला लग्नानंतर घरकाम करायचे नसल्यास तिने ते लग्नापूर्वीच स्पष्टपणे सांगावे; असे निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका केसमध्ये नोंदविले आहे. याप्रकरणी विवाहित महिलेला आपल्या कुटुंबासाठी घरकाम करायला लावणे म्हणजे क्रूरता नाही; असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती राजेश एस पाटील यांनी या केस संदर्भातील निरक्षण नोंदवत महिलेने पती आणि सासरच्यांविरूद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
Section 498A IPC] Making married woman do household work for family not cruelty: Bombay High Court
Read story: https://t.co/tqn8btc4pV pic.twitter.com/5inYnuIhLk
— Bar & Bench (@barandbench) October 27, 2022
याप्रकरणात महिलेने लग्नानंतर सासरच्या लोकांनी मला चांगली वागणूक दिली. मात्र महिन्यानंतर पतीसह सासरचे लोक माझ्यासोबत मोलकरणीप्रमाणे वागू लागल्याची तक्रार केली होती. तेसच माहेरहून ४ लाख रूपये आणण्याची मागणी केली असल्याची आणि माझा वारंवार शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात येत असल्याचे म्हणत या महिलेने पोलीस ठाण्याच तक्रार दाखल केला होती. यानंतर पतीसह सासरच्या लोकांवर कलम ४९८ (अ), हुड्यांसाठी छळ (कलम ३३२), हेतूपूर्वक अपमान (कलम ५०४), गुन्हेगारी आणि धमकी देणे (कलम ५०६) याप्रकारच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर हे आरोप खोटे असल्याचा दावा करत पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर पती आणि सारच्या मंडळींविरूद्ध करण्यात आलेली एफआयआर न्यायालयाच्या निर्णयाने रद्द करण्यात आली.
याप्रकरणी निर्णय देताना न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणात मानसिक आणि शारीरीक छळ हे शब्द भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८(अ) नुसार कारवाई करण्यास पुरेसा नाही. यातून क्रूर वागणूक दिली असल्याचे स्पष्ट होत नाही. त्यामुळे संबंधित महिलेने केलेले आरोप हा गुन्हा ठरत नाहीत असे म्हणत उच्च न्यायालयाने सदर गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुलींना जर घरकाम करण्याची इच्छा नसेल तर त्यांनी लग्नापूर्वीच सांगावे असेही मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले आहे.