

नवी दिल्ली; जाल खंबाटा : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी 96 टक्के मतदान झाले. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मंगळवारी मतमोजणी सुरू
होणार असून बुधवारी (19 ऑक्टोबर) निकाल जाहीर होईल. खर्गे यांना गांधी कुटुंबाचा पाठिंबा असल्याची चर्चा
असल्याने आणि काँग्रेसच्या बहुतांश वरिष्ठ नेत्यांची पसंती खर्गेंना असल्याने त्यांचा विजय या निवडणुकीत निश्चित
मानला जात आहे.
9,900 पैकी 9,400 वर प्रदेश काँग्रेससमितीप्रतिनिधींनीगुप्तमतदानाद्वारे पक्षप्रमुख निवडीसाठी आपापला कौल
दिला. पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात सहाव्यांदा एआयसीसी मुख्यालय आणि देशभरातील 68 मतदान केंद्रांवर
मतदान झाले. राहुल गांधी यांनीही भारत जोडो यात्रा शिबिरात संगनाकल्लू येथे उभारलेल्या बूथवर रांगेत उभे
राहून मतदान केले. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि प्रियांका गांधी-
वधेरा यांनी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयात मतदान केले.
मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निकालानंतर काँग्रेसमध्ये 24 वर्षांनी नेहरू-गांधी कुटुंबाव्यतिरिक्त
कुणीतरी अध्यक्ष होणार आहे.
शशी थरूर यांनी मतदानानंतर एक ट्विट केले असून, 'वर्तमान मूक राहिले नव्हते, हे इतिहासाच्या स्मरणात असावे म्हणूनही काही लढाया आम्ही लढत असतो', असे त्यात नमूद केले आहे. थरूर यांनी निवडणुकीत पक्षपात होत असल्याचा आरोपही यापूर्वी केला आहे. त्यांचे ट्विट म्हणजे निकालापूर्वीच त्यांनी पराभव मान्य केल्याचे संकेत
आहेत, असे राजकीय वर्तुळातून मानले जाते.